हिंदमाता म्हणजे पावसाळ्यात तुंबणारे पाणी हे वर्षांनुवष्रे जमलेले समीकरण इतिहासजमा करण्यात फक्त एकच अडथळा उभा आहे, तो म्हणजे प्लास्टिक पिशव्यांचा.. हिंदमाता परिसरातील पाणी उपसणारे ब्रिटानिया उदंचन केंद्र जूनमध्ये सुरू होईल आणि त्यामुळे वर्षांनुवष्रे महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला तोंड द्यावा लागणारा एक प्रश्न कायमचा सुटेल. पाणी उपसणाऱ्या पंपामध्ये वस्तू अडकू नयेत म्हणून लावलेल्या जाळ्यांमधूनही सहज निसटू शकणाऱ्या पिशव्यांनी मात्र पालिका अधिकाऱ्यांची झोप उडवली आहे. सध्या पाणीकपातीची चर्चा सर्वात जास्त असली तरी महानगरपालिका प्रशासन मुंबईच्या मुसळधार पावसाला तोंड देण्याची तयारी करीत आहे. त्यातच पालिकेच्या निवडणुका समोर असल्याने पावसाळा व्यवस्थित पार पाडण्याच्या दृष्टीने सत्ताधारीही कामाला लागलेत. अनेक वष्रे या ना त्या कारणाने रखडलेले ब्रिटानिया उदंचन केंद्र जूनमध्ये सुरू करण्यासाठी सुरू असलेली युद्धपातळीवरील तयारी हा त्याचाच एक भाग. हिंदमाता, काळाचौकी, भायखळा या भागांतून नाल्यांमधून येणारे पाणी भरतीच्या वेळी या केंद्रातील पंपाद्वारे बाहेर काढले जाईल. सहा हजार लिटर याप्रमाणे सहा पंपांतून ३६ हजार लिटर पाणी एका सेंकदात बाहेर फेकले जाईल. चार पंप पुरेसे असून आपत्कालीन स्थितीत काम करण्यासाठी अतिरिक्त दोन पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. नाल्यातून वाहत येणारे दगड, लाकडी सामान, पाण्याच्या बाटल्या अशा वस्तू पंपामध्ये अडकून बसू नयेत यासाठी नाल्याच्या बाजूने जाळ्या लावल्या गेल्या आहेत.मात्र या सर्व जय्यत तयारीचा काही मिनिटांत फज्जा उडवण्याची क्षमता आहे ती प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांची. गटारे, नाले, कचराभूमी येथे साम्राज्य पसरलेल्या या पिशव्यांमुळे याआधीही मुंबईकरांना अनेकदा त्रास सहन करावा लागला आहे. कचऱ्याने भरलेल्या या पिशव्या गटाराच्या तोंडावर बसून अनेक ठिकाणी पाणी तुंबते. या जाळीतून कोणतीही मोठी वस्तू पंपामध्ये जाणार नाही. लहान वस्तू पंपातून समुद्रात फेकल्या जातील, त्यामुळे त्यांचाही अडथळा नाही. मात्र कितीही बारीक जाळ्या लावल्या तरी प्लास्टिकच्या पिशव्या त्यातून मार्ग काढतात. पावसाच्या वेळी तर प्रचंड प्रमाणात या पिशव्या वाहत येतात. या पिशव्या एकत्र येऊन पंपाच्या एखाद्या भागात अडकल्या तर मात्र परिस्थिती कठीण होईल, असे पालिकेचे उपायुक्त लक्ष्मण व्हटकर म्हणाले. दोन अतिरिक्त पंपांची सोय आहे. मात्र प्लास्टिकच्या पिशव्यांवर काय उपाय करायचा ते सापडत नाही, असेही त्यांनी सांगितले. उदंचन केंद्र म्हणजे काय? भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी शहरात येऊ नये यासाठी नाल्याचे तोंड बंद केले जाते. मात्र त्याच वेळी मुसळधार पाऊस सुरू असला तर शहरातील पाणी बाहेर पडत नसल्याने सखल भागात पाणी तुंबते. हे पाणी खेचून समुद्रात टाकण्याचे काम उदंचन केंद्र करतात. शहरातील उदंचन केंद्र वर्सोवा येथील इर्ला, वरळी येथील लव्हग्रोव्ह, हाजीअली आणि क्लीव्हलॅण्ड ही चार उदंचन केंद्रे सुरू. ब्रिटानिया जूनमध्ये सुरू होईल. जुहू येथील गजधरबंद, अंधेरी मोगरा नाला आणि माहूल येथील केंद्र अजूनही सुरू होणे बाकी आहे.