प्लास्टिक बंदीचा कायदा करण हे यश नसून त्याची अंमलबाजवणी आपण कशी करतो त्यामध्ये खरे यश आहे असे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले. प्लास्टिकला पर्यायी वस्तू काय असू शकतात त्यासंबंधी आयोजित केलेल्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, महापालिका आयुक्त आणि अभिनेजी काजोल, अजय देवगण सहभागी झाले आहेत. प्लास्टिक बंदी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य नसून अठरावे राज्य आहे असे आदित्य म्हणाले. प्लास्टिक बंदी कायदा उद्यापासून म्हणजे २३ जून पासून लागू होणार आहे मात्र त्याआधीच लोकांनी प्लास्टिकचा वापर बंद करुन कापडी पिशव्या हाती घेतल्या आहेत ते खरच कौतुकास्पद आहे असे आदित्य म्हणाले. आपण आपले समुद्र पाहिले तर तुम्हाला प्लास्टिकची बेट तयार झालेली पाहायला मिळतील. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर बंद करणे आवश्यक आहे. निश्चितच यामुळे जग बदलण्यात हातभार लागेल असे आदित्य म्हणाले. एखादी वस्तू बंद केल्यानंतर पर्याय काय हे महत्वाचे असते. लोकांना कमीत कमी त्रास झाला पाहिजे असे आदित्य म्हणाले. एकदा वापरुन आपण जे प्लास्टिक फेकून देतो त्यावर बंदी घालण्यात आली आहे असे आदित्य म्हणाले. प्लास्टिक बंदीचा कायदा करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचेही आदित्य ठाकरेंनी कौतुक केले. तुमच्यावर दबाव असतानाही प्लास्टिक बंदीचा निर्णय तुम्ही घेतलात असे आदित्य म्हणाले.