अभिनेत्री कंगना रणौत आणि दिलजित दोसांज यांच्यातल्या वादाची बातमी ताजी असतानाच आता कंगनाबद्दल आणखी एक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री कंगना रणौतचं ट्विटर अकाऊंट बंद करण्यात यावं यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. कंगना रणौत तिच्या ट्विट्समधून सातत्याने तिरस्कार पसरवण्याचं काम करत असते त्यामुळे तिचं ट्विटर अकाऊंट बंद करण्यात यावं असं या याचिकेत म्हटलं आहे. देशातील एकोपा, बंधुभाव बिघडेल, वातावरण गढूळ होईल असे तिचे ट्विट्स असतात. एवढंच नाही तर तिने न्याय व्यवस्थेचीही अनेकदा खिल्ली उडवली आहे त्यामुळे तिचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात कंगनाने ट्विट करुन मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर अनेक कलाकारांनी कंगनाच्या या ट्विटचा निषेध नोंदवला होता. तसंच जेव्हा ती मुंबईत आली तेव्हाही तिने तिच्या ऑफिसवर झालेल्या कारवाईनंतर काही वादग्रस्त ट्विट्स केले होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेखही पप्पूसेना असा केला होता. न्यायव्यवस्था, पोलीस यांचीही तिने खिल्ली उडवली होती. तिच्या ट्विट्सचा आशय तसाच होता. त्यामुळे आता कंगनाचं ट्विटर हँडल बंद करण्यात यावं अशी मागणी हायकोर्टात याचिका दाखल करुन करण्यात आली आहे. याबाबत हायकोर्ट काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आजच कंगनाचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे कारण आहे तिचा आणि दिलजित दोसांजचा झालेला वाद. शेतकरी आंदोलनावरुन दिलजितने कंगनाला सुनावलं त्यानंतर दिलजीत दोसांजवर कंगनाने खालच्या भाषेत टीका केली आहे. त्यावर दिलजीतनेही तिला उत्तर दिलं आहे. दरम्यान या दोघांचा वाद ताजा असतानाच कंगनाचं ट्विटर अकाऊंट बंद करण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.