ज्येष्ठ कवी नलेश पाटील यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. . कवितांच्या गावा जावे या कविता वाचनाच्या कार्यक्रमातून त्यांनी मराठी कवितांना कानाकोप-यात पोहोचवण्याचे मोलाचे कार्य केले. पालघर जिल्ह्यात १९५४ मध्ये जन्मलेले नलेश पाटील यांचे संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असले तरी नलेश पाटील यांचा मराठीचा गाढा अभ्यास होता. मुंबईतल्या जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट्स या संस्थेतून नलेश पाटील यांनी शिक्षण घेतले. अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, नलेश पाटील, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, सौमित्र आणि नलेश पाटील या कवींनी कवितांच्या गावा जावे हा काव्य वाचनाचा कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी मराठी कवितांना जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. माणूस, निसर्ग आणि समुद्र हे त्यांच्या कवितेच्या अग्रस्थानी असायचे. गेल्या काही वर्षांपासून त्यांना मधूमेहाने ग्रासले होते. बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. नलेश पाटील यांच्या पश्चात पत्नी आणि कन्या असा परिवार आहे.कवितांसोबतच नलेश पाटील यांचा चित्रकलेची आवड होती. ते उत्तम चित्रदेखील काढायचे. नलेश पाटील यांच्या कवितांमधून गावाकडचा निसर्ग झळकायचा. त्यांच्या कवितांमध्ये रंगसंवेदनाही होती अशी प्रतिक्रिया देत कोमसापचे अध्यक्ष महेश केळुस्कर यांनी नलेश पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.