मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर मराठा संघटनांनी पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आंदोलकांना सध्या मुंबईच्या वेशीवरच रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. यासाठी सोमवारी सकाळपासूनच मुलुंड आणि मानखुर्द येथे पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

मराठा आरक्षणावरून मराठा संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. यासाठी काही संघटनांनी शहरात जोरदार आंदोलन करण्याचे ठरवले आहे. मुंबईत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन करून सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न या संघटनांकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्य़ांमधून मोठय़ा प्रमाणात मराठा समाजाचे कार्यकर्ते शहरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून ठाणे, मुलुंड आणि मानखुर्द टोलनाका परिसरात पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता.

या वेळी संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांना थांबवून पोलीस या वाहनांची तपासणी करत होते.  या नाकाबंदीमुळे वाहतूक कोंडी झाल्याने सामान्य प्रवाशांना याचा त्रास सोसावा लागला.