शीव-पनवेल महामार्गाच्या दुर्दशेबाबत पोलिसांचे खरमरीत पत्र; वाहनांचा वेग पादचाऱ्यांपेक्षा कमी असल्याची टीका

मुंबई : खड्डय़ांनी व्यापून टाकलेल्या शीव-पनवेल महामार्गावर लागलेल्या वाहनांच्या रांगांनी मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल शहरांतील अंतर्गत वाहतुकीचा बोजवारा उडवलेला असतानाच या वाहनकोंडीचा फटका आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालाही बसत आहे. शीव-पनवेल महामार्गाच्या दुर्दशेबाबत महामार्ग पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही या मार्गाची दुरुस्ती न झाल्याने आता पोलिसांनी या विभागाला खरमरीत पत्र पाठवले आहे. त्यात महामार्गावरील वाहनांचा वेग हा चालत जाण्याच्या वेगापेक्षाही कमी असल्याचे म्हटले आहे.

मुंबईहून नवी मुंबई तसेच पुणे व कोकणच्या दिशेने ये-जा करण्यासाठी शीव-पनवेल महामार्ग महत्त्वाचा आहे. राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी १२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून या महामार्गाचे रुंदीकरण व काही ठिकाणी काँक्रीटीकरण केले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. नवी मुंबईतील खारघरपासून वाशी गावपर्यंतच्या महामार्गावर वाहनांच्या रांगा लागत असल्याने याचा परिणाम आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवरही दिसून येत आहे. महामार्ग पोलीस आणि नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार केला.

गतवर्षी ३० जून आणि २१ जुलै रोजी या विभागाला पत्र पाठवून पोलिसांनी खड्डे बुजवण्याची विनंती केली. २१ जुलैच्या पत्रासोबत तर खड्डय़ांची छायाचित्रे आणि ठिकाणेही नमूद करण्यात आली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यावर काहीच कार्यवाही केली नाही.

यावर्षी ३० जून रोजी झालेल्या मान्सूनपूर्व बैठकीतही शीव-पनवेल महामार्गावरील खड्डय़ांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवून रस्ता व्यवस्थित केल्याचे महामार्ग पोलिसांना कळवले. मात्र जुलैच्या पहिल्या आठवडय़ात पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात सर्वत्र खड्डे असल्याचे आडळून आले. त्यानंतर १६ जुलै रोजी पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांनाच पत्र पाठवून या रस्त्याची दुरवस्था त्यांच्यासमोर मांडली आहे. तसेच या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग चालत जाण्याच्या वेगापेक्षाही कमी असल्याची खरमरीत टीका या पत्रात करण्यात आली आहे.

पोलिसांना आढळलेली खड्डय़ांची ठिकाणे

* वाशी गाव (मुंबई-पुणे दोन्ही दिशेने)

* तुर्भे पूल उतरल्यानंतर (दोन्ही दिशेने)

* नेरुळ पूल उतरल्यानंतर

* सीबीडी पूल (दोन्ही दिशेने)

* खारघर पुढील कोपरा पूल उतरल्यानंतर (दोन्ही दिशेने)

शीव-पनवेल महामार्गावर असलेल्या खड्डय़ांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतुकीवरही ताण येत आहे. त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहारही केला जात असून या मार्गावरील समस्यांची माहिती देण्यात आली आहे.

– विजय पाटील, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस मुख्यालय