भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील कागदपत्रे बुधवारी नवी दिल्लीत प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्चपदस्थांकडे सोपविली होती. दोन-चार आठवड्यांत याबाबत कार्यवाही अपेक्षित आहे आणि आता विदर्भातील एका मंत्र्याचा गैरव्यवहार बाहेर काढणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले होते. यामुळे सोमय्या यांनी आपल्याला घरातून अटक करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या घरासमोर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

तसेच कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून किरीट सोमय्या यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्ही जिल्ह्यात येऊ नये, असे सोमय्यांना सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या घराबाहेर मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

कोल्हापूर दौरा थांबवण्यासाठी सरकारची ही दडपशाही असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.  हसन मुश्रीफांचे घोटाळे दाबण्यासाठी हा माझ्यावर दबाव आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत तर माझ्या मुंबईतील घराखाली येण्याची हिंमत कशी केली, असा सवाल सोमय्या यांनी पोलिसांना केला. तसेच मला कीतीही अडवलं तरी मी कोल्हापूरला जाणार, असे देखील सोमय्या म्हणाले.

किरीट सोमय्या दहशतवादी आहेत का?

“किरीट सोमय्या यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त ठेवायला ते दहशतवादी आहेत का? भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महाविकास आघाडी सरकारला सवाल. महाविकास आघाडीच्या दडपशाही, गुंड प्रवृत्तीला भाजपा घाबरणार नाही. भाजपा किरीट सोमय्या यांच्या पाठीशी आहे.” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

“किरीट सोमय्या यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त ठेवायला ते दहशतवादी आहेत का?”

चंद्रकांत पाटील म्हणाले, “माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या घराबाहेर १०० पोलिसांनी वेढा घातला आहे. किरीट सोमय्या दहशतवादी आहे का? दहशतवादी उजळ माथ्याने फिरत आहेत. मुंबईत घातपात करण्यासाठी बॉम्बस्फोट करण्यासाठी गॅसच्या माध्यमातून स्फोट घडवण्यासाठी मुंबईत दहशतवादी काम करत आहेत. काही पकडले जात आहेत, काही पकडले गेलेले नाहीत. इकडे किरीट सोमय्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची प्रकरण काढत असताना, त्यांना सांगितलं जात आहे की तुम्ही कोल्हापुरला यायाचं नाही. तुम्हाला आम्ही कोल्हापूर रेल्वेस्टेशनवरून परत पाठवू. कोल्हापूरच्या सक्रिटहाउसला ताब्यात घेऊ. म्हणजे काय  लोकशाही संपली? जे म्हणायचं ते म्हणायचं नाही का? कशाच्या आधारावर तुम्ही त्यांना ताब्यात घेणार आहात? ही दंडूकेशाही चालणार नाही. तुम्ही दडपण्याचा प्रयत्न केला तरी ते दडपले जाणार नाहीत.”