मुंबई: बदलत्या स्वरुपातील गुन्हेगारीतचा तसेच  दहशतवादाच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी लहानपणापासूनच मुलांना शालेय शिक्षणस्तरावर पोलीसी शिक्षिण देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सभेत केले. सर्व सामान्य माणसांमध्ये पोलिसांबद्दल विश्वासाचे वातावरण तयार करा, असा सल्लाही त्यांनी दिली. पोलीस मुख्यालयात आयोजित केलेल्या  राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की, विज्ञानाच्या वापरामध्ये गुन्हेगारांपेक्षा नेहमीच पोलिसांचे एक पाऊल पुढे असले पाहिजे.

दहशतवाद तसेच नक्षलवादाशी लढा देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी आणखी कठोर तयारी करावी. आज गुन्ह्यंच्या स्वरुपात आणि गुन्हेगारांमध्ये खूप बदल झाला आहे. पोलीस दलामध्ये ज्याप्रमाणे उच्च शिक्षित, तंत्रशिक्षित येत आहेत,  त्याचप्रमाणे गुन्हेगार, नक्षलवादीदेखील सुशिक्षत असल्याचे दिसून येते. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांच्या तंत्राचा, मानसिकतेचा अभ्यास करुन तपास पद्धतीत वारंवार सुधारणा करत राहिले पाहिजे. सिंगापूरसारख्या देशात प्रत्येक नागरिकाला पोलीसी प्रशिक्षण बंधनकारक आहे. अशा आव्हानांचा आपल्याला सामना करायचा असेल तर यासंबंधीचे शिक्षण शालेय पातळीपासूनच द्यावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

पोलीस गृहप्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत

पोलीस गृहनिर्माण प्रकल्पांसाठी राज्य शासन आवश्यक ती तरतूद करेल. पोलीसांच्या गृहप्रकल्पांची कामे दर्जेदार व्हावीत. ती वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, असे उपमुख्यममंत्री अजित पवार यांनी सांगितले.  वॉरंट बजावण्यासाठी जाताना तसेच गुन्हेगारांना ताब्यात घेऊन येताना पोलिसांना एसटीच्या साध्या बसचा प्रवास लागू आहे. मात्र, वेगवान हालचालींची आवश्यकता लक्षात घेता ‘शिवनेरी’, आरामगाडय़ांचा प्रवास अनुज्ञेय करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे पवार यावेळी म्हणाले. गृहमंत्री अनिल देशमुख यावेळी म्हणाले की, जगभरात ड्रोन हल्लय़ाच्या घटना घडत असल्याचे दिसून येते. हे एक नवीन आव्हान समोर आहे. याचा सामना करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करुन कार्यान्वित करण्याची गरज आहे. पोलीस खात्यामध्ये ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’चा वापर कसा करता येईल याचाही विचार व्हावा. नवी मुंबई मध्ये महापे येथे ‘महाराष्ट्र सायबर’च्या मुख्यालयाच्या कामाला गती द्यावी.