प्रभू रामचंद्र हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय आहेत असे वक्तव्य भाजपा खासदार पूनम महाजन यांनी केलं आहे. महाराष्ट्राचं आणि उत्तर भारताचं नातं खूप जुनं आहे. प्रभू राम हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय होते असा संदर्भ त्यांनी जोडला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाकडून आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात पूनम महाजन बोलत होत्या. यावेळी त्यांनी उत्तर भारतीय मुंबईचा कणा आहेत असेही वक्तव्य केले. गेल्या काही दिवसांमध्ये मनसे असो किंवा शिवसेना यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. राज ठाकरे तर सातत्याने परप्रांतीयांचा मुद्दा मांडत असतात. अशात आता भाजपा खासदार पूनम महाजन यांनी प्रभू रामचंद्र हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय होते असं वक्तव्य केलं आहे. राम मंदिर होणार की नाही हा मुद्दा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगलाच गाजतो आहे. राम मंदिरासंदर्भात अध्यादेश काढा अशीही मागणी होते आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहणार असे म्हटले आहे. तर विरोधक मात्र भाजपाला राम मंदिर निर्मितीची इच्छाच नाही या त्यांच्या टीकेवर ठाम आहेत. निवडणुकांच्या आधी राम मंदिराचा मुद्दा एवढा गाजत असताना भाजपा खासदार पूनम महाजन यांनी प्रभू रामचंद्राना उत्तर भारतीय म्हटले आहे. आता या वक्तव्यावरुन राजकीय पटलावर कशा प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे