प्रकाश आंबेडकरांच्या अटीने पुन्हा काँग्रेससमोर पेच मुंबई : वंचित बुहजन आघाडी हा भाजपचा ब संघ आहे, असा आरोप लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता, त्याबाबत त्यांची आज काय भूमिका आहे, याचे स्पष्टीकरणे केले, तरच विधानसभा निवडणुकीतील आघाडीबाबत चर्चा करू, असा पेच अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससमोर उभा केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्याची इच्छा व्यक्त केली, तसेच त्याबाबत चर्चा सुरू करावी असे आवाहन केले होते. या संदर्भात गुरुवारी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत वंचित आघाडी व काँग्रेसमधील पत्रव्यवहाराची सविस्तर माहिती दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या पत्रावर आघाडीनेही सकारात्मक पत्र पाठविले. परंतु वंचित आघाडी ही भाजपचा ‘ब संघ’ आहे, आसा आरोप लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. वंचित आघाडीबाबत काँग्रेसची नेमकी काय भूमिका आहे, हे समजले पाहिजे. त्याबाबत खुलासा करावा, असे आघाडीने पत्र पाठवून काँग्रेसला विचारले होते. त्यानंतर काँग्रेसकडून दोन पत्रे आली, परंतु आम्ही विचारलेल्या प्रश्नाला बगल देण्यात आल्याचे आंबेडकर म्हणाले. आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले तरच काँग्रेसशी आघाडीची चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पहिली यादी ऑगस्ट अखेर वंचित बहुजन आघाडीची विधानसभेच्या २८८ जागा लढविण्याची तयारी आहे. आमची पहिली यादी ऑगस्टअखेपर्यंत जाहीर होईल. उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसबरोबर आघाडीबाबत बोलणी करण्यात काही अर्थ राहणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.