छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने केलेली आत्महत्या हे विनाकारण केलेले कृत्य असल्याचे सांगत हार मानून आयुष्य संपविणाऱ्यांचे नव्हे, तर संघर्ष करणाऱ्यांचे जग कौतुक करत असल्याचे मत प्रसिध्द अभिनेत्री हेमामालिनी यांनी व्यक्त केले. एक एप्रिल रोजी ‘बालिका वधू’ स्टार आपल्या राहात्या घरात मृत अवस्थेत आढळून आली. बॉयफ्रेण्ड राहुल राज सिंहसोबतच्या तणावपूर्ण संबंधातून तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हताश होऊन आत्महत्या करण्यापेक्षा जीवनातील कठीण प्रसंगात संघर्ष करायला हवा, असे मत हेमामालिनी यांनी व्यक्त केले आहे. टि्वटरवरील आपल्या संदेशात त्या म्हणतात, विनाकारण आत्महत्या केल्याने काहीही साध्य होत नाही. जीवन देवाची देणगी आहे. ते नष्ट करण्यासाठी नसून जगण्यासाठी आहे. जीवन संपविण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. दबावात येऊन परिस्थिती पुढे गुढघे टेकून जीवनाचा त्याग करण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीला सर्व प्रकारच्या अडचणींतून बाहेर पडून यश प्राप्त करण्यास शिकले पाहिजे. संघर्ष करणाऱ्यांचे जगात कौतुक होते, हारणाऱ्यांचे नव्हे. माध्यमांनी ज्याप्रकारे प्रत्युषाच्या आत्महत्येचे प्रकरण हाताळले त्यावरदेखील त्यांनी आक्षेप नोंदविला.