संदीप आचार्य

मुंबईतील सगळी आरोग्य व्यवस्था आज करोनाच्या युद्धात उतरली आहे. अशा वेळी सामान्य रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत. त्यातही कर्करोग रुग्णांचे हाल खूप मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. करोनाच्या युद्धातही शेकडो कर्करुग्णांसाठी माझगाव येथील प्रिन्स अलीखान रुग्णालय एकहाती लढा देत आहे.

दररोज कर्करोग रुग्ण मोठय़ा प्रमाणात प्रिन्स अलीखान रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. करोनाशी लढण्यात बहुतेक व्यवस्था गुंतून राहिल्यामुळे कर्करोगग्रस्त रुग्णांच्या पुढे ढकललेल्या शस्त्रक्रिया आता जर सुरू केल्या नाहीत तर करोनापेक्षा कर्करोगाने मृत्यू पावलेल्यांची संख्या जास्त दिसेल असा इशारा अनेक तज्ज्ञांनी दिला आहे. बहुतेक मोठी रुग्णालये एकतर बंद तरी आहेत किंवा काही प्रमाणात सुरू आहेत. बहुतेक नर्सिंग होम्स आजही बंद असल्याचा मोठा फटका केमोथेरपी घेणाऱ्या कर्करुग्णांना बसत आहे.

करोनाच्या सुरुवातीला परळच्या टाटा कॅन्सर रुग्णालयानेही अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता बहुतेक पूर्वनियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलून टाटा कॅन्सर रुग्णालयात करोना रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग सुपू केला होता.

राज्यातीलच नव्हे तर देशातील बहुतेक कॅन्सर रुग्णालयांनी पूर्वनियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्याचा मोठा फटका कर्करुग्णांना बसल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर ७५ व्या वर्षांत पदार्पण केलेल्या प्रिन्स अलीखान रुग्णालयाने सर्व शक्ती कर्करुग्णांवरील उपचारासाठी लावली आहे. डॉ. सुलतान प्रधान यांच्यासारखे डॉक्टर वयाच्या ७६व्या वर्षीही त्यांच्या टीमसह दररोज जवळपास पंधरा ते वीस शस्त्रक्रिया करतात तर ६८ वर्षांंचे डॉ. तपन सैकिया तेवढय़ाच कर्करुग्णांवर केमोथेरपीचे उपचार करत असल्याचे रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय ओक यांनी सांगितले.