करोनाच्या पार्श्वभूमीवर परस्परांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याबरोबरच रस्ते, बाजारपेठांबरोबरच रुग्णालये, कार्यालयांमध्ये तीन स्तराचा मास्क घालणे नागरिकांना बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क न घालताच सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी बुधवारी दिले. ठाण्यातही हाच नियम लागू आहे.

आवाहन करूनही मुंबईकर निष्काळजीपणा दाखवत आहेत. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी अनेकजण मास्क न वापरता बाहेर पडत असल्याने करोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढत आहे.

राज्यात लागू करण्यात आलेल्या ‘साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७’ नुसार ‘महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२०’ अन्वये महापालिका आयुक्तांना देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मुंबई, ठाण्यातील आयुक्तांनी वरील आदेश दिले आहेत. आता रस्ते, रुग्णालये, कार्यालये, बाजारपेठा अशा सर्व ठिकाणी तीन स्तरांचा किंवा चांगल्या पद्धतीने घरीच बनवलेला स्वच्छ मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनचालक आणि वाहनात बसलेल्या सर्वानी मास्क घालणे आवश्यक आहे.

बाधितांची संख्या वाढली

मुंबई : मुंबईमध्ये करोनाचा विळखा हळूहळू घट्ट होऊ लागला असून बुधवारी दिवसभरात तब्बल १०६ जणांना करोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले. पुण्यात बुधवारी एकाच दिवसात आठ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ३२ नव्या रुग्णांची नोंद झाली.

चाचण्या विनाशुल्क करा : सर्वोच्च न्यायालय

खासगी प्रयोगशाळा कोविड १९ विषाणूच्या चाचणीसाठी अवाजवी पैसे आकारणार नाहीत याची काळजी सरकारने घ्यावी तसेच प्रयोगशाळांनी आकारलेल्या शुल्काची प्रतिपूर्ती करून चाचणी नागरिकांसाठी मोफत होईल, यासाठी प्रयत्न करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे.

मुंबईत २४१ ठिकाणी भाजीविक्री नाही :  मुंबईत पालिकेने २४१ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर केली असून . संसर्ग होण्याचा मोठा धोका लक्षात घेत आता या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये भाजी विक्रीस मनाई करण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रांतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्या यासाठी भाजी विक्रीस परवानगी होती. त्याचा गैरफायदा नागरिक घेत होते.

भाटिया रुग्णालयही प्रतिबंधित : मुंबई – भाटिया रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल झालेल्या तीन रुग्णांना करोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे रुग्णालय प्रतिबंधित केले आहे. आता येथे नवे रुग्ण दाखल करून घेतले जाणार नाहीत. तीन रुग्ण काही दिवसापूर्वी येथेआले होते. यांचे नमुने कस्तुरबामध्ये चाचणीसाठी पाठविलेले. त्यांचे अहवाल सकारात्मक आले आहेत.