माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची आठवण

मे २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात अ. भा. काँग्रेस समितीचा गुजरात आणि दादरा-नगर हवेलीचा प्रभारी म्हणून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबर सिल्वासा येथे जात होतो. सोनिया गांधी यांच्या हेलिकॉप्टरच्या पाठोपाठ आमचे हेलिकॉप्टर होते. अहमद पटेल, शैलजा, मी आणि विशेष सुरक्षा पथकाचा (एसपीजी) अधिकारी असे चौघे हेलिकॉप्टरमध्ये होतो. हेलिकॉप्टर हवेत असतानाच बिघाड निर्माण झाला आणि वैमानिकाने हळूहळू मैदानाजवळ उतरविण्याचा प्रयत्न केला. हेलिकॉप्टरच्या शेपटाची बाजू तुटल्याने खाली उतरताना आपटले आणि घरंगळत गेले. दरवाजा उघडला गेल्याने हेलिकॉप्टरमधून मी बाहेर फेकलो गेलो. तेव्हा डोक्याला खोक पडली. सोनिया गांधी यांच्या सुरक्षा ताफ्यात असलेल्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. टाके घालण्यात आले. हेलिकॉप्टर हवेत आणखी उंचावर असते तर अपघातातून बचावणे कठीणच होते. पण सुदैवाने तेव्हा बचावलो होतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपघात झालेले हेलिकॉप्टर आपल्याच काळात खरेदी करण्यात आले होते. ५५ कोटी खरेदी करून हेलिकॉप्टर खरेदी केल्याने तेव्हा टीका झाली होती.

हवेचा प्रक्षोभ म्हणजे काय?

  • ’हवेच्या प्रक्षोभामुळे (एअर टब्र्युलन्स) मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर खाली उतरवले गेल्याचे सांगण्यात येते. हवेचे प्रक्षोभ ही वातावरणातील सामान्य घटना आहे. विमान किंवा हेलिकॉप्टर हे स्थिर हवेवर तरंगत जात असते. मात्र तापमान तसेच वेगवेगळ्या दिशांनी येत असलेल्या वाऱ्यांमुळे हवेत समुद्राच्या लाटांप्रमाणे स्थिती निर्माण होते व त्यामुळे विमानाला हादरे बसून ते वर-खाली किंवा एका बाजूला कलंडू शकते.
  • ’सध्या दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा येथे ढगाळ वातावरण असून काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. दुपारचे कडाक्याचे ऊन व वाऱ्याची उलटसुलट दिशा यामुळे हवेच्या खालच्या स्तरात लाटा निर्माण होणे शक्य आहे.
  • काही वेळा स्वच्छ हवेतही हा प्रक्षोभ असू शकतो. मात्र शक्यतो अशी स्थिती हवेच्या वरच्या थरात आढळते.
  • हवेचे प्रक्षोभ समजण्यासाठी तांत्रिक यंत्रणा विमानात तसेच हेलिकॉप्टरमध्ये उपलब्ध असते व उंचावरून प्रवास करताना अनेकदा वैमानिक असे हवेचे प्रक्षोभ टाळण्याचा प्रयत्न करतात.
  • हवामानशास्त्र विभागाकडून जमिनीपासून दहा मीटर ते दीड किलोमीटर, दीड किलोमीटर ते १० किलोमीटर व १० किलोमीटरवरील अशा तीन टप्प्यात नोंदी घेतल्या जातात. अशाप्रकारच्या अपघातांवेळी स्थानिक पातळीवरील हवामानाची माहिती केंद्रीय हवामानशास्त्र विभागाकडून सरकारकडे पाठवली जाते. यावेळीही ही माहिती पाठवण्यात आली असून त्याबद्दल अधिक बोलता येणार नाही, असे हवामानशास्त्र विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.