अंधेरी, धारावी, मालाडमध्ये लवकरच प्रकल्पाची मुहूर्तमेढ

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता 

मुंबई : वापरलेले सॅनिटरी नॅपकीन, डायपर, ऑइलपेंट, सुगंधी द्रव्ये, वाया गेलेली औषधे, बॅटरी अशा प्रकारचा घराघरांत निर्माण होणारा रासायनिक घातक कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्याचे पालिकेने ठरवले आहे. त्यासाठी मुंबईत अंधेरी, धारावी, मालाड अशा तीन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ‘अनारोबिक प्लाझ्मा तंत्रज्ञाना’वर आधारित प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. हे प्रकल्प येत्या १५ दिवसांत सुरू होणार असून भविष्यात ओल्या-सुक्या कचऱ्याबरोबरच नागरिकांना घातक कचराही वेगळा करावा लागणार आहे.

कचराभूमीची क्षमता संपत आल्यामुळे तिथे जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागातर्फे  विविध उपाययोजना केल्या जात आहेत. घनकचरा व्यवस्थापन कायदा २०१६ अंतर्गत पालिकेने आता घातक कचराही वेगळा करण्याचे ठरवले आहे. घराघरांत तयार होणाऱ्या या घातक कचऱ्यावर (डोमेस्टिक हॅजार्डस वेस्ट) प्रक्रिया करण्यासाठी पालिके ने अनारोबिक प्लाझ्मा तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. त्यासाठी मुंबईत तीन ठिकाणी सुका कचरा संक लन केंद्राजवळील जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. माहीम-धारावी जोडमार्गावर, अंधेरी पश्चिमेकडे व मालाडमधील पालिकेच्या गुरांच्या कोंडवाडय़ाजवळील जागेवर या प्रकल्पासाठी आवश्यक ती यंत्रसामग्री उभारण्यात आली असून येत्या १५ दिवसांत हे प्रकल्प मार्गी लागतील, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागातील कार्यकारी अभियंता अनंत भागवतकर यांनी दिली. हा प्रकल्प राबवल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हासही थांबेल तसेच कायद्याचेही पालन होईल, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून एका यंत्राची क्षमता दिवसाला चार टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास भविष्यात त्याची व्याप्ती वाढवण्यात येईल. त्यासाठी मुंबईत दररोज घातक कचरा गोळा करण्यासाठी वेगळ्या वाहनाची व्यवस्था करणे, हा कचरा वेगळा करण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे अशा उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या हा कचरा रोजच्या कचऱ्यातच फेकला जातो किंवा सुक्या कचऱ्यात टाकला जातो. त्यामुळे सुक्या कचऱ्यातून हा कचरा वेगळा करून प्रक्रिया के ंद्रात पाठवता येईल यासाठी हे प्रकल्प सुका कचरा केंद्राजवळ उभारण्यात आले आहेत.

मुंबईत सध्या दिवसाला ६५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो.

त्यापैकी दररोज ७० मेट्रिक टन

कचरा हा घरगुती घातक कचरा असतो.

घरगुती घातक कचऱ्यात काय काय?

सॅनिटरी पॅड, वाया गेलेली औषधे व गोळ्या, ऑइल पेंटचे डबे, नेल पॉलिशच्या बाटल्या, लिपस्टिक, सुगंधी द्रव्ये (परफ्युम्स)

या प्रकल्पाच्या एका यंत्राची क्षमता चार टनची असून त्याची किं मत व प्रकल्प चालवण्याचा व देखभाल मिळून वर्षभरासाठी सव्वादोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे, तर तीन ठिकाणी प्रकल्पासाठी सहा कोटींचा खर्च येणार आहे. मात्र जेवढय़ा घातक कचऱ्याची विल्हेवाट या प्रकल्पात लावली जाणार आहे, तेवढय़ा कचऱ्याच्या विल्हेवाटीचा खर्च वाचणार आहे. तसेच क्षेपणभूमीवरील कचरा कमी होणार आहे.

अनोरोबिक प्लाझ्मा तंत्रज्ञान म्हणजे काय?

या तंत्रज्ञानामध्ये घरगुती घातक कचऱ्यावर तापमानाची (थर्मल ट्रीटमेंट) प्रक्रिया के ली जाणार आहे. या प्रक्रियेत धूर होत नाही तर कचऱ्याची राख होते. कचऱ्याच्या प्रमाणापेक्षा ७ टक्के  राख तयार होते.