देशभरात नेट न्युट्रॅलिटीबाबात वाद-विवाद सुरू असताना यामध्ये आता आयआयटीच्या प्राध्यापकांनीही उडी घेतली आहे.
देशातील विविध आयआयटीयन प्राध्यापकांनी एकत्र येऊन दूरसंचार नियमन प्राधिकारणा(ट्राय)ने नेट न्युट्रॅलिटीबाबत सादर केलेल्या सल्लापत्रावर आक्षेप नोंदवत हे सल्लापत्र दिशाभूल आणि गोंधळ निर्माण करणारे असल्याचे नमूद केले आहे. मुंबई, दिल्ली, मद्रास, पटणा, खरगपूर आणि कानपूर आयआयटीसोबतच विज्ञान संस्था आणि कोलकाता आयआयएम या संस्थांमधील सुमारे ५० प्राध्यापकांनी एकत्र येऊन ट्रायच्या सल्लापत्रावर आक्षेप नोंदविले आहेत. ट्रायने सादर केलेल्या सल्लापत्रात नेट न्युट्रॅलिटी आणि नेटवर्क न्युट्रॅलिटीबाबत काही मुद्दे मांडले आहेत. यातील मोबाइल कंपन्यांच्या वापरकर्त्यांपैकी १० टक्के वापरकर्ते हे कंपनीचे ९० टक्के बँडविड्थ वापरतात हा मुद्दा तांत्रिकदृष्टय़ा तसेच मूलभूतदृष्टय़ा चुकीचा असल्याचे प्राध्यापकांनी आक्षेपात नमूद केले आहे. याचबरोबर सल्लापत्रात नमूद करण्यात आलेल्या सेवेतील फरकाच्या मुद्दय़ालाही पुरेसा अर्थ नसल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.