सर्पमित्रांच्या वनविभागाकडील नोंदणीच्या कामास चालना मिळाली आहे. त्यामुळे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन आणि सर्प बचावाच्या दस्तावेजीकरण आणि गैरप्रकारांना आळा बसण्याच्या कामास मोठी मदत होऊ शकते असे मत सर्प तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. मानवी वस्तीत आलेल्या सापांचा बचाव करणे, त्यांना सुरक्षित अधिवासात सोडणे याबाबत ८० च्या दशकापासून राज्यात स्वयंसेवी पातळीवर काम सुरु झाले. त्यातून सर्पमित्र ही संकल्पना पुढे आली. मात्र त्याचबरोबर त्यामध्ये गैरप्रकार करणे, सापाची योग्य हाताळणी न करणे असे प्रकारदेखील काही ठिकाणी दिसू लागले. त्यासाठी विविध संस्था, तज्ज्ञ आणि वनविभागामार्फत जानेवारी २०१८ मध्ये मार्गदर्शक तत्त्वे आणि आचारसंहिता तयार करण्यात आली. मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे अनेक सर्पमित्र नमूद करतात. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘सर्प संरक्षण स्वयंसेवक’ होऊ इच्छिणाऱ्यांनी स्थानिक उपवन संरक्षक किंवा विभागीय वन अधिकारी कार्यालयात अर्ज करणे अपेक्षित आहे. त्या माहितीची तपासणी झाल्यानंतर, स्वयंसेवकांची यादी जनतेच्या हितासाठी प्रसिद्ध केली जाईल. मात्र दोन वर्षांत या कामाल कसलीच गती मिळाली नव्हती. ‘सर्पमित्रांनी नमूद केलेल्या अधिकाऱ्यांकडे मार्गदर्शक तत्वानुसार विहित नमुन्यात या संदर्भात अर्ज करावा. त्यानुसार वनाधिकारी पुढील प्रक्रिया करतील,’ असे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितिन काकोडकर यांनी सांगितले. ‘स्थानिक वनाधिकारी दोन वर्षांंपासून स्वतंत्र आदेश नसल्याचे कारण देत असल्याने नोंदणीच करत नव्हते,’ असे आऊल्स या संस्थेचे ज्येष्ठ सर्पमित्र गणेश मेहंदळे यांनी सांगितले. मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ ‘गेल्या काही वर्षांत सर्पमित्र म्हणवून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी मार्गदर्शक तत्त्वानुसार काम न करण्याने सर्पमित्रांचेच मृत्यु होताना आढळतात,’ असे सर्प तज्ज्ञ केदार भिडे यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांत केवळ पश्चिम महाराष्ट्रात ४२ सर्पमित्र मरण पावले. केवळ साप पकडणे आणि सोडणे इतपतच हे काम सध्या मर्यादीत झाले असून त्या अनुषंगाने त्याचा अभ्यास, दस्तावेजीकरण, प्रशिक्षण या बाबींचा अभाव दिसून येतो. मोजक्याच संस्था अशा नियमांचे पालन करतात, असे भिडे यांनी नमूद केले.