भीमा कोरेगाव सरकार पुरस्कृतच; विखे-पाटील यांचा आरोप

भीमा कोरेगावचे हिंसाचार हा सरकार पुरस्कृत होता तसेच मुंबईतील कमला मिलमधील आगीचे प्रकरण दडपण्याचा सरकारकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी केला.

शिवसेना-भाजपचे नेते, हॉटेल व पबचे मालक आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या संगनमतातून कमला मिलसह मुंबईत अन्यत्र मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीरपणे हॉटेल्स, पब, हुक्का पार्लर सुरू आहेत. या साऱ्यांना वाचविण्याकरिताच प्रकरण दडपले जात असल्याचा आरोपही विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. या वेळी माजी मंत्री सुरेश शेट्टी, संजय दत्त आदी उपस्थित होते. कमला मिलमधील हॉटेल्सना कोणी पाठीशी घातले हे जगजाहीर आहे. या दुर्घटनेची चौकशी महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सोपविणे म्हणून चोराच्या हातात किल्ल्या देण्यासारखे आहे, असा आरोपही विखे-पाटील यांनी केला.

भीमा कोरेगावचा हिंसाचार हा सरकार पुरस्कृत होता आणि मराठा व दलित समाजात तेढ निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका विखे-पाटील यांनी दिली. नागपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले. राज्यात सर्वत्रच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोजोचा मालक तुलीचा अर्ज फेटाळला

सत्र न्यायालयाने शुक्रवारी हॉटेल व्यावसायिक आणि कमला मिल अग्निकांडातील आरोपी युग तुली याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. गेल्या बारा दिवसांपासून तो फरार आहे.