खाटा पळविणे किंवा लक्ष्यभेदवरून केलेले वक्तव्य यामुळे सुरुवातीपासून अखेपर्यंत वादग्रस्त ठरलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी महिनाभराच्या किसान यात्रेला उत्तर प्रदेशात चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाला मते मिळण्यास या यात्रेचा कितपत उपयोग होईल, असा प्रश्न पक्षाच्या नेत्यांना पडला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी यांनी देवरिया ते दिल्ली अशी महिनाभराची किसान यात्रा काढली होती. उत्तर प्रदेशातील एकूण ४०० पैकी २३० विधानसभा मतदारसंघातून या यात्रेचा प्रवास झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवडणूक प्रचाराचे नियोजन केलेल्या प्रशांत किशोर यांच्याकडे पक्षाची रणनिती ठरविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ‘खाट पे चर्चा’ असा कायक्रम तयार करण्यात आला होता. पहिल्याच खाट सभेत राहुल गांधी यांचे भाषण संपताच सभेला जमलेल्यांनी खाटा पळविल्या होत्या. खाटा पळविण्याच्या प्रकारामुळेच राहुल यांची यात्रा सुरुवातीला गाजली. यात्रेची सांगता दिल्लीत झाली.

राहुल मैदानात, नेते घरात

राहुल गांधी यांच्या यात्रेला बऱ्यापैकी गर्दी झाली होती.  राहुल गांधी यांच्या यात्रेत उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्यात आलेल्या शिला दीक्षित काही अपवाद वगळता सहभागी झाल्या नव्हत्या. तसेच पक्षाचे नेतृत्व सोपविण्यात आलेले राज बब्बरही सर्वत्र बरोबर नव्हते. यातून चुकीचा संदेश गेल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. राहुल गांधी दौऱ्यात स्थानिक नेत्यांना बरोबर घेत नाहीत, अशी टीका मागे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. हे पुन्हा अनुभवास मिळाले. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या गेल्या २७ वर्षांमध्ये पिछेहाट झाली. गेल्या वेळी काँग्रेसचे २८ आमदार निवडून आले होते. यंदा त्यापेक्षा कमी उमेदवार निवडून येतील, असा दावा दिल्लीत विरोधी पक्षाचे नेते खासगीत करतात. गेल्या वेळचा आकडा टिकला तरीही राहुल यांच्या यात्रेचा उपयोग झाला, अशी कोटी एका माजी केंद्रीय मंत्र्याने केली.