पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगाव-मालाड दरम्यान रूळाला तडे गेल्याने चर्चगेटहून बोरीवलीकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रूळ दुरूस्तीचे काम सुरू असून लवकरच वाहतूक सुरळित होईल, असे सांगण्यात येते. गेल्या अर्ध्या तासांत एकही रेल्वे बोरिवलीकडे न आल्याने स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. पश्चिम रेल्वेने ३० मिनिटांत वाहतूक सुरळीत होईल, असे सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत रेल्वे रूळाला तडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी मध्य रेल्वेवर असा प्रकार झाला होता. आता पश्चिम रेल्वेमध्ये हा प्रकार घडला आहे. सकाळची वेळ असल्यामुळे कार्यालय, महाविद्यालयात जाणाऱ्यांची मोठी गर्दी असते. नेमके याचवेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये संताप आहे. दरम्यान, बोरिवलीकडे रेल्वे येण्यास सुरू झाल्याचे वृत्त आहे.