अर्थसंकल्पामध्ये रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा आश्वासक सूर नव उमंग, नव तरंग जीवन का नव प्रसंग नवल चाह, नवल राह जीवन का नव प्रवाह - कवी हरिवंशराय यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात संपूर्ण जनतेच्याच आशाआकांक्षांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वेचे आधुनिकीकरण, नवीन वेगवान गाडय़ा, दिव्यांग प्रवाशांच्या अडचणी, मोबाइल चार्जिगच्या अडचणी, रेल्वेशी संबंधित नवोद्योगांना चालना देऊन रोजगार निर्मिती, महिलांच्या अडचणी, बालकांसाठी रेल्वेत आहाराची उपलब्धता अशा विविध घटकांना न्याय देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. रेल्वे खात्याचा मंत्री म्हणून मी प्रत्यक्ष रेल्वे स्टेशनवर जाऊन अनुभवही घेतले आहेत, त्यामुळे रेल्वेला लोकांची हमसफर बनवण्याचा प्रयत्न यात आहे. अनेक ठिकाणी भेटी दिल्या, मुंबई सेंट्रल स्टेशनला गेलो असताना महिलांचा एक गट स्टेशनची सफाई करताना दिसला, मला पाहिल्यावर एक महिला माझ्याकडे आली व त्यांच्या स्वयंसेवी संस्थेला सेवेची संधी दिल्याबद्दल आभार मानले, राष्ट्रीय कामात आनंद मानण्याची ही भावना समाजात आता रुजत आहे. दुसऱ्या एका घटनेत रेल्वे सुरक्षा दलांचे नव्याने समाजमाध्यम विभागात जबाबदारी दिलेल्या आलोक तिवारी यांना लोकांच्या छोटय़ा अडचणी सोडवताना मिळालेले समाधान व त्यातून सामान्य लोकांच्या जीवनात रेल्वेच्या माध्यमातून पडणारा फरक याचे त्यांनीच सांगितलेले महत्त्व लक्षणीय आहे. रेल्वेपुढील आव्हाने सातवा वेतन आयोग, उत्पादनाशी निगडित वाढणारा बोनस, जागतिक मंदीसदृश वातावरणाचा अर्थव्यवस्थेतील पायाभूत क्षेत्रांवर झालेला परिणाम, एकूण प्रवासी व मालवाहतुकीत रेल्वेचा घटत चाललेला वाटा याला तोंड देत रेल्वेची घोडदौड चालू ठेवावी लागणार आहे. ‘पिंक बुक’ची संकल्पना रेल्वेत प्रथमच ‘पिंक बुक’ ची संकल्पना राबवण्यात येत असून त्यात राज्य व केंद्र तसेच इतर संस्थांच्या सहकार्याने मंजूर केलेल्या प्रकल्पांची माहिती असेल. मागणीनुसार आरक्षण उपलब्धता, मालगाडय़ांच्या वेळापत्रकांची काटेकोर अंमलबजावणी, प्रवाशांची सुरक्षितता, निर्मनुष्य रेल्वे फाटकांची संख्या कमी करणे, असे अनेक मुद्दे नव्या दृष्टिकोनात त्यांनी मांडले. रेल्वे सुधारणांसाठी देब्रॉय समितीने केलेल्या शिफारशींचा चांगला उपयोग झाला आहे. येत्या ३-४ वर्षांत आश्वासन दिलेले सर्व रेल्वे प्रकल्प पूर्ण करेल. गेल्या वर्षीपेक्षा ३० टक्के जास्त म्हणजे रोज ७ किमी वेगाने २५०० कि.मी मार्ग ब्रॉडगेज करण्याचे उद्दिष्ट ठेवताना २८०० कि.मी मार्गाचा प्रत्यक्ष वापर सुरू करण्यात येईल, २०१७-१८ मध्ये ९ कोटी तर २०१८-१९ मध्ये १४ कोटी मनुष्यदिवस रोजगार निर्माण केला जाईल. रेल्वेचे विद्युतीकरण १० ते १५ वर्षांत पूर्ण होईल. वीज खरेदीत आम्ही पैसे वाचवणार आहोत. जयगड, दिघी, रेवस व पारादिप या बंदरांशी जोडणारी रेल्वे सेवा सुरू करण्यात येईल, एकूण ७५१७ कि.मी. चा सागरी किनारा रेल्वेने जोडण्याचा मानस आहे. मेक इन इंडिया.. मेक इन इंडिया योजनेत दोन रेल्वे डबे कारखाने सुरू करण्यात येणार असून जागतिक पातळीवर रेल्वे डब्यांची निर्यात केली जाईल. महत्त्वाच्या मार्गावर रेल्वेचे ८८४ डबे वाढवून प्रवासी क्षमता ६५ हजारांनी वाढवली आहे. १२४ खासदारांनी त्यांच्या निधीतून प्रवासी सुविधेवर खर्च करण्याचे वचन दिले आहे. प्रवाशांच्या सोयीसुविधात यांत्रिक धुलाई केंद्रे, २५०० पेयजल यंत्रे, मोबाइल चार्जिग सुविधा, सर्व वर्गाच्या प्रवाशांना स्वच्छ बिछान्यांची व्यवस्था, १७ हजार जैव प्रसाधनगृहे, १७८० यांत्रिक तिकीट केंद्रे, २२५ नाणी यंत्रे, दर मिनिटाला दोन हजार ते सात हजार दोनशे ई-तिकिटे देण्याची सुविधा, दोन वर्षांत ४०० स्थानकांवर वायफाय, चारशे स्थानकांचा पुनर्विकास, मोबाइल आधारित उपयोजने, गोइंडिया स्मार्टकार्ड योजना, जादाच्या एकूण १००० गाडय़ात हाउसकिपिंग सेवा दिली जाणार आहे. कुटुंबीयांची साथ.. प्रभू यांच्या पत्नी उमा व मुलगा अमया हे अतिथी गॅलरीत उपस्थित होते. रेल्वे मंत्र्यांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी बाक वाजवून शाबासकीची थाप दिली. रोजगार निर्मितीवर रेल्वेचा भर राहील असे त्यांनी सांगताच मोदी यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. सूटकेस विसरले प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पाचे वाचन झाल्यावर सभागृह सोडले. ते अगदी दरवाजापर्यंत आले; तेव्हा त्यांना अर्थसंकल्पाची सूटकेस तेथेच राहिल्याचे लक्षात आले; परत जाऊन त्यांनी सूटकेस घेतली व बाहेर पडले. विरोधकांकडून निषेध डावे पक्ष व काँग्रेस यांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करताना शेम. शेम च्या घोषणा दिल्या. हा रेल्वे अर्थसंकल्प माझ्या एकटय़ाचा नाही तर तो भारताचा आत्मा असलेल्या जनतेचा आहे. त्यातून लोकांच्या आशाआकांक्षांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक लोकांनी मला विविध गोष्टी लिहून कळवल्या. त्यांच्याशी समाजमाध्यमातून मी संपर्कात आहेच, काहीवेळा वेगवेगळ्या भेटीतून लोकांच्या भावना व अडचणी कानावर आल्या. संसदेतील काही सहकाऱ्यांनी, प्रवासी संघटना व प्रसारमाध्यमांनी काही कल्पना मांडल्या, त्याला मी प्रतिसाद दिला आहे. ग्राहक सेवेचा अनुभवच आम्ही बदलत आहोत, रेल्वे ही रोजगार निर्मितीचेही इंजिन आहे, आर्थिक विकासाचा पाया आहे.