६७,६०१ पैकी अवघ्या ९,१४३ गुन्ह्य़ांची उकल; मोबाइल, पाकीट चोरीच्या सर्वाधिक तक्रारी

सुशांत मोरे, मुंबई</strong>

लोकल प्रवासात प्रवाशांना तोंड द्याव्या लागणाऱ्या मोबाइल, पाकीट चोरी, विनयभंग इत्यादी गुन्ह्य़ांना आळा घालण्यात रेल्वेला यश आले असले तरी, त्यांची उकल करून गुन्हेगारांना पकडण्यातही लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाला अपयश येत आहे. मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरी मार्गावर २०१८ व २०१९ मध्ये तब्बल ६७ हजार ६०१ विविध गुन्ह्य़ांची नोंद झाली. मात्र यापैकी अवघ्या ९ हजार १४३ गुन्ह्य़ांचीच उकल आतापर्यंत झाली आहे. यात सर्वाधिक तक्रारी मोबाइल व पाकीट चोरीच्या आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना केल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. २०१८च्या तुलनेत २०१९मध्ये प्रवासादरम्यान घडणाऱ्या विविध गुन्ह्य़ांना काही प्रमाणात आळा घालण्यात रेल्वेला यश आले आहे. मात्र, गुन्ह्य़ांची उकल करून गुन्हेगारांना पकडण्यात रेल्वेची यंत्रणा अपुरी पडते आहे. चोरीची घटना नेमकी कधी व कुठे झाली हेच तक्रारदाराला माहीत नसते. त्यामुळेही गुन्ह्य़ांची उकल करणे अवघड होत असल्याचे लोहमार्ग पोलीस सांगतात. कधीकधी आरोपींचे वर्णन तक्रारदाराने सांगितल्यामुळे किंवा सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाच्या मदतीने गुन्ह्य़ांचा छडा लागतो. मात्र त्याचे प्रमाण कमी आहे.

२०१८ मध्ये रेल्वेच्या तिन्ही मार्गावर विविध ३९ हजार ३१८ गुन्ह्य़ांची नोंद झाली होती. त्यापैकी केवळ ४ हजार ९९७ गुन्ह्य़ांची उकल करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले. २०१९ मध्ये गुन्ह्य़ांचे प्रमाण कमी म्हणजे २८ हजार २८३ वर आले. यावेळीही केवळ ४ हजार १४६ गुन्ह्य़ांचा छडा लावण्यात रेल्वेला यश आले. मोबाईल चोरी व पाकीटमारीच्या गुन्ह्य़ांनी प्रवासी सर्वाधिक त्रस्त आहेत. २८ हजार २८३ पैकी २१ हजार ५५७ गुन्हे मोबाईल व पाकीटचोरीचे आहेत. या शिवाय बॅग लंपास केल्याच्या १,७७१ व साखळी चोरीच्या २२७ गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण, वडाळा, बोरीवली, अंधेरी, वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात या सर्वाधिक गुन्ह्य़ांची नोंद होत आहे.

मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे या तिन्ही मार्गावरून दिवसाला ७५ ते ८० लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करतात. यात महिलांची संख्या १५ ते २० टक्के आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १२ डब्यांमधील तीन महिला डब्यांत लोहमार्ग पोलीस तैनात असतात. ही व्यवस्था अपुरी पडू लागल्याने रेल्वेने लोकलमधील महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले. तरी प्रवासादरम्यान विनयभंग, बलात्कार, छेडछाड आदी गुन्ह्य़ांच्या तक्रारी आहेत.

फटका गँगची दहशत कायम

लोकलच्या दरवाजाजवळ उभे राहून मोबाइलवर बोलणाऱ्या प्रवाशांच्या हातावर रुळाजवळच उभे असणाऱ्या अज्ञात व्यक्तीकडून एखाद्या वस्तूने फटका मारला जातो. त्यामुळे त्याच्या हातातील मोबाइल खाली पडतो. पडलेला मोबाईल लंपास करणाऱ्या फटका गँगच्या कारवायांना आळा घालण्यात रेल्वेला अपयश आले आहे. या गुन्हेगारांना पकडण्यासाठी रुळांजवळ काही ठिकाणी पोलिसांनी गस्ती पथक तैनात केले आहेत. मात्र त्यानंतरही या गुन्ह्य़ांना आळा बसलेला नाही.