राज्यात कोसळणाऱ्या पावसाचा फुलांना फटका बसण्याची शक्यता मुंबई : बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असून त्यामुळे राज्यात कोसळणाऱ्या पावसाचा झेंडूच्या फु लांना फटका बसण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दसऱ्याच्या दिवशीही मुंबईतील फु लबाजारांमध्ये उत्तम झेंडू मिळणे कठीण होण्याची शक्यता आहे. चांगल्या प्रतीच्या झेंडूची आवक सध्या कमी झाली असून, ओली फुले बाजारात येत आहेत. या वर्षी झेंडूच्या बागांच्या शेतकऱ्यांवर एकापाठोपाठ एक संकट येत असून येत्या काही दिवसांमध्ये पाऊस कोसळण्याच्या शक्यतेने त्यात आणखी भर पडली आहे. करोनाकाळात झेंडू शहरात पाठवता येत नसल्याने कोल्हापूर,-सांगली जिल्ह्यातील अनेक बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. त्यानंतर गणेशोत्सव डोळ्यासमोर ठेवून नवीन लागवड केलेल्या बागांना महापुराचा फटका बसला. लागवडीनंतर साधारण ५० दिवसात झेंडूचे फूल मिळू लागते, त्यासाठी घेतलेले कष्ट पावसामुळे वाया जात आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. गेल्या आठवडय़ातील चक्रीवादळसदृश परिस्थिती आता निवळली असली तरी बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा पाऊस झाला, तर दसऱ्यापर्यंत दर्जेदार आणि न भिजलेला झेंडू मुंबईच्या बाजारात मिळणे कठीण होईल अशी शक्यता दिसत असल्याचे शेतकरी आणि व्यापारी यांनी नमूद केले. पावसामुळे मोठी हानी गणेशोत्सवानंतर दसऱ्यासाठी नवीन लागवड करणे फारसे शक्य नसते, अधिक महिना अश्विन असल्याने दसरा डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी आधीच लागवड केली. मात्र गेल्या आठवडय़ातील पावसामुळे फुले भिजून मोठी हानी झाल्याचे कोल्हापूर जिल्ह्यातील कोथळी येथील शेतकऱ्यांनी सांगितले. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील सर्व भागातून येणाऱ्या झेंडूचे प्रमाण कमी झाल्याचे, व्यावसायिक भरत मरजे यांनी सांगितले. पाऊस आला तर खांडेनवमी आणि दसऱ्याला उत्तम दर्जाचा झेंडू मिळणे कठीण असल्याचे मरजे म्हणाले. बराचसा झेंडू भिजला असल्याने फेकून द्यावा लागत असून, पुढील दोनचार दिवस जर उन असेल तर फुले बाजारात येऊ शकतील, असे दादर येथील फुलांचे घाऊक विक्रेते संजय जाधव यांनी सांगितले. सध्या कोल्हापूर-सांगलीबरोबरच इतर ठिकाणाहूनदेखील फुले मुंबईच्या बाजारात येत आहेत, असे ते म्हणाले.