विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षांना राज ठाकरेंनी जाहीर विरोध केला आणि परीक्षांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. राज यांच्या इशाऱ्याची सरकारनं दखल घेतल्याचे दिसत आहे. ज्या राज्यांमध्ये दहावीचा पेपर फुटल्याचं आढळलंय फक्त त्याच राज्यांमध्ये दहावीच्या परीक्षा कदाचित होतील, अन्य राज्यांमध्ये होणार नाही असं सरकारनं जाहीर केलं. बारावीच्या विद्यार्थ्यांना मात्र फेरपरीक्षा द्यावी लागणार आहे. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरच हे पाऊल उचलण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या दहावीच्या विद्यार्थ्यांवरचं संकट टळलं आहे.

राज ठाकरे म्हणाले होते की, “सस्नेह जय महाराष्ट्र,
सीबीएसईच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षे आधीच फुटल्या, हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा, पण स्वतःची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहेत? सरकारला जर प्रश्नपत्रिकांची गोपनीयता नीट राखता येत नसेल तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष, त्यांनी का पुन्हा त्या विषयांच्या परीक्षेला बसायचं?

माझं देशभरातील पालकांना आवाहन आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका. तुम्ही झुकताय हे जर सरकारच्या लक्षात आलं तर ते तुम्हाला अजून वाकवायचा प्रयत्न करेल. तुम्ही निर्णयावर ठाम रहा, सरकारला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठाम उभी आहे, उभी राहील.”