महायुतीचे घटक असलेल्या रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सुरुवातीपासून मनसेला शिवसेना-भाजप-रिपाईं महायुतीत घेण्यास ठाम विरोध केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही कालपर्यंत यावर मौनच बाळगले होते. मात्र आत प्रश्न लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा असल्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेला ‘टाळी’ देण्यास विरोध केला, तर रामदास आठवले यांना प्रसंगी ‘टाटा’ करण्याचीही उद्धव ठाकरे यांची तयारी असेल, असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे. भीमशक्ती व शिवशक्ती एकत्र यावी अशी भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा व्यक्त केली होती. मात्र ती सोयीची नसल्यामुळेच रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सेनेबरोबर जाण्याचे टाळले होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीने आपली फसगत केल्याचे लक्षात आल्यामुळेच रिपाईने शिवसेनेबरोबर युती करण्याची भूमिका स्वीकारली.  मुंबई व ठाणे महापालिकेची सत्ता राखण्यात रिपाईबरोरची युती फायद्याचीच राहणार हे ओळखून सेनेनेही महायुती करण्याचा निर्णय घेतला. मुंबई व ठाणे महापालिका निवडणुकीत सेनेला आपले गड राखता आले तरी मतांचा विचार करता रिपाईबरोबरील युतीचा फारसा फायदा झाला नसल्याचेच दिसून आले. यापूर्वी मनसेमुळे लोकसभा व विधानसभेत बसलेला फटका आणि मनसेला भरभरून मिळणारी मते लक्षात घेऊन भाजप नेते गोपीनाथ मुंडे व अन्य भाजप नेते महायुतीत मनसेला समील करून घ्यावे अशी भूमिका सतत मांडत होते तर रामदास आठवले यांनी त्याला वेळोवेळी जोरदार विरोध केला. या साऱ्या काळात उद्धव ठाकरे हे तटस्थ राहिले होते. आता महाराष्ट्रात पुन्हा सत्ता हस्तगत करायची असेल तर मनसेशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाल्यानेच उद्धव यांनी राज ठाकरे यांच्यापुढे टाळीसाठी हात पुढे केला आहे.  आठवले यांनी विरोध केला तर त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे असाच याचा अर्थ असून सेनेने रिपाईला ‘टाटा’ करण्याचीच तयारी ठेवली असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.