उत्सव साजरे झालेच पाहिजेत, मात्र या उत्सवातून कुणाचे जीव जाऊ नयेत. त्यामुळे दहीहंडी उत्सवावर न्यायालयाने घातलेले र्निबध योग्यच आहेत, असे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘मिक्ता- २०१४’ नाटय़-चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी येथे आले होते. त्यावेळी दहीहंडी उत्सवावर उच्च न्यायालयाने आणलेल्या र्निबधांबाबत विचारले असता राज म्हणाले, ‘उत्सव साजरे झालेच पाहिजेत, पण या उत्सवातून कुणाचे जीव जाऊ नयेत, अशी अपेक्षा आहे.’
 या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून उपस्थितांशी संवाद साधत राज ठाकरे यांनी ब्लू प्रिंटविषयी येणाऱ्या वृत्तासंबंधी स्पष्टीकरण दिले. काही चॅनेलवाले व्हॉटस् अ‍ॅपवरील संदेशाच्या आधारे ब्लू प्रिंटविषयी बातम्या प्रसारित करीत असून त्यांचे पाहून काही वृत्तपत्रे दुसऱ्या दिवशी तीच बातमी प्रसिद्ध करीत आहेत. ब्लू प्रिंटविषयी अद्याप काहीच जाहीर केलेले नसतानाही अशा प्रकारचे निराधार वृत्त प्रसारित होत असून ‘मूल झालं की सांगतो, त्यासाठी सारखा दरवाजा ठोकायची गरज नाही’, अशा शब्दांत राज यांनी माध्यमांची कानउघाडणी केली.