सोमवारी संपकरी शेतकरी भेटणार

राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून नऊ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आता तर नाडलेल्या या संतप्त शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी थेट संपाचे हत्यार उपसले असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आक्रोश लक्षात घेऊन केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठोक मदत करावी, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पंतप्रधानांना एका पत्राद्वारे करणार असल्याचे राज यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले.

राज्यात एक कोटी ३४ लाख शेतकरी असून यातील नव्वद लाख शेतकरी हे नियमित कर्ज फेडत आहेत, तर ३० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेवर येताच पंधरा दिवसांत कर्जमाफीची घोषणाही केली. महाराष्ट्रातही सत्तेवर येण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची, तसेच स्वामिनाथन समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची घोषणा भाजपने केली आहे. तथापि गेल्या अडीच वर्षांत या घोषणेची अंमलबजावणी करण्यात आली नसून राज्याची खाली असलेली तिजोरी पाहता शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे राज्याला परवडणारे नाही. अशा वेळी केंद्राने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आर्थिक मदत केली पाहिजे, अशी राज यांची भूमिका आहे. ३० लाख शेतकऱ्यांना ३१ हजार पाचशे कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशमध्येही ३२ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा झाली असून उत्तर प्रदेशच्या अर्थसंकल्पाचा विचार करता केंद्राच्या मदतीशिवाय याची अंमलबजावणी करणे त्यांनाही शक्य नाही.

मुंबई व महाराष्ट्रातून देशाला सर्वाधिक कर मिळतो. तसेच कृ षी उत्पादनातही महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. हे लक्षात घेता महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा दिलासा मिळणे गरजेचे असल्याने केंद्र शासनाने हा आर्थिक भार उचलला पाहिजे, अशी भूमिका पंतप्रधानांना पाठविण्यात येणाऱ्या पत्रात राज घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील शेतीपंपांना वीजजोडणी, सिंचनासाठी ठोक मदतीपासून कृषी उत्पादन खर्चापेक्षा दुप्पट हमीभाव देण्याची जी घोषणा पंतप्रधानांनी केली होती, त्याचीही अंमलबजावणी महाराष्ट्रापासून करण्यात यावी, अशी मागणीही केली जाणार आहे.