राजीव सातव यांच्या वाटचालीला कलाटणी मुंबई : वशिलेबाजी, घोषणाबाजी, शक्तिप्रदर्शन, घराणेशाहीतून युवक काँग्रेसच्या अध्यक्षाची निवड होते ही परंपरा राजीव सातव यांच्या प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या नियुक्तीच्या वेळी खंडित झाली होती. राहुल गांधी यांनी तासभर मुलाखत घेऊन मगच सातव यांची नियुक्ती केली आणि त्यानंतरच त्यांच्या राजकीय वाटचालीला कलाटणी मिळाली. काँग्रेसमधील काही जुन्या प्रथा-परंपरांना छेद देण्यावर पक्षाचे उपाध्यक्ष असताना राहुल गांधी यांनी भर दिला होता. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांनी तेव्हा मुलाखती घेतल्या होत्या. राजीव सातव यांचीही तेव्हा कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणेच मुलाखत घेण्यात आली. पक्षासाठी काय करणार, पक्ष वाढीसाठी कार्यक्र म काय आहे, असे विविध प्रश्न तेव्हा सातव यांना विचारण्यात आले. सातव यांनी सादरीकरणाने राहुल गांधी हे प्रभावित झाले होते. थोडय़ाच दिवसांत राजीव सातव यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. मुलाखतीच्या माध्यमातून नियुक्ती झालेले हे काँग्रेसमधील पहिले अध्यक्ष होते. राहुल गांधी यांच्या विश्वासातील युवा नेत्यांच्या फळीत त्यांना स्थान मिळाले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सातव यांचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला गेला होता. पण राहुल गांधी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करा, असा निरोप दिला. राहुल गांधी यांचीच विनंती असल्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने हा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडला होता व सातव आमदार झाले. राज्य मंत्रिमंडळात समावेश व्हावा म्हणून सातव यांची इच्छा होती, पण राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविली व तेव्हापासून ते राष्ट्रीय राजकारणात सक्रि य झाले. पुढे लोकसभा खासदार, काँग्रेसचे सचिव, गुजरातचे प्रभारी आदी विविध पदे भूषविली. सातव यांनी मुलाखतीत मांडलेली मते व पक्ष वाढीसाठी भविष्यातील योजना यातून राहुल गांधी हे भलतेच प्रभावित झाले आणि त्यातूनच गेल्या दहा वर्षांत राहुल यांच्या विश्वासातील नेते म्हणून ते ओळखले जाऊ लागले. गेल्या वर्षी पक्षाच्या बैठकीत काँग्रेसच्या पीछेहाटीस यूपीए-२ सरकारची निराशाजनक कामगिरी जबाबदार असल्याचे विधान सातव यांनी केल्याने वाद झाला होता, पण काँग्रेस नेतृत्वाने सातव यांनाच पाठबळ दिले होते. ‘सायटोमॅगिलो’ विषाणूचा संसर्ग राजीव सातव यांना करोना संसर्ग झाल्याचे पुढे आल्यानंतर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्यामुळे कृत्रिम श्वसन यंत्रणेद्वारे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातून त्यांनी करोना संसर्गावर मातही के ली होती. मात्र, करोनामुक्त झाल्यानंतर त्यांना ‘सायटोमॅगिलो’ विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यांच्या फु प्फु सात संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही त्याबाबतची माहिती दिली होती. ‘सायटोमॅगिलो’ विषाणू शरीरात आढळल्यानंतर त्यादृष्टीने उपचार करण्याची सूचना टोपे यांनी वैद्यकीय तज्ज्ञांना के ली होती. ‘सायटोमॅगिलो’ हा विषाणू सर्वसाधारण विषाणू असला तरी लाळ आणि थुंकीद्वारे तो संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये संक्रमित होतो. डोके दुखी, ताप आणि श्वास घेण्यास अडथळा अशी या आजाराची लक्षणे आहेत. या संसर्गाचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी के ली जाते. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना हा विषाणू धोकादायक ठरतो. लहान मुलांमध्येही हा विषाणू आढळून येतो. आदरांजली संसदेतील माझे मित्र काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनाने गुणवत्ता-क्षमता असलेले एक तरुण नेतृत्व आपण गमावले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या- मित्रपरिवाराच्या दु:खात मी सहभागी आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान **** राजीव सातव यांच्या अकाली निधनाने धक्का बसला. ते एक तडफदार संसदपटू होते आणि लोकांच्या प्रश्नांशी त्यांची बांधिलकी होती. त्यांच्या कुटुंबीयांच्या- मित्रपरिवाराच्या दु:खात मी सहभागी आहे. - वेंकय्या नायडू, उपराष्ट्रपती **** अत्यंत लहान वयात सातव यांनी पक्षात महत्त्वाची भूमिका बजाविली होती. संसद सदस्य म्हणून लोकांचे प्रश्न ते मांडत असत. त्यांच्या निधनाने पक्षाचे नुकसान झाले. - सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्षा **** राजकारणातील संयमी, उमद्या नेतृत्वाचे अकाली जाणे क्लेशदायक आहे. राजीव सातव यांनी आपल्या प्रांजळ स्वभावाने पक्ष, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मित्र जोडले होते. संसदीय प्रणालीवर दृढ विश्वास असणारे आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जात असे. त्यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबावर, पक्षावर मोठा आघात आहे, तो सहन करण्याची शक्ती सातव कुटुंबीयांना मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री **** राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमध्ये पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत त्यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तेथे चांगले यश मिळवून दिले. राज्यातील एका उमद्या नेत्याचा अकाली अस्त झाला आहे. - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष **** राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने व देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे. - अजित पवार, उपमुख्यमंत्री **** राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दु:खद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते **** जमिनीशी घट्ट नाते जोडलेले युवा नेतृत्व म्हणून अत्यंत कमी वेळेत आपली स्वतंत्र यशोगाथा निर्माण केलेले मित्र खासदार सातव यांच्या अकाली निधनाने व्यथित झालो. एक तडफदार युवा नेतृत्व आणि एक परममित्र गमावल्याचे दु:ख कायम मनात राहील. - धनंजय मुंडे, मंत्री, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग **** खासदार राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेसने प्रत्येक संधीचं सोनं करणारे तरुण तडफदार नेतृत्व गमावले. सातव यांची संघटनात्मक कामाची पद्धत, तळमळ अभिमानास्पद होती. राहुल गांधींनी दिलेल्या अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या नेतृत्वाच्या संधीतून त्यांनी पक्षाला अधिकाधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री