ऊसदर आंदोलनात जखमी झालेल्या एका हवालदाराच्या मृत्यूप्रकरणी शिरोळ (जि. कोल्हापूर) पोलिसांनी दाखल केलेल्या खुनाच्या गुन्ह्य़ाविरोधात उच्च न्यायालयात याचिका सादर करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
मी सरकार किंवा पोलिसांना घाबरत नसून या गुन्ह्यात अटक होऊ नये, यासाठी अटकपूर्व जामीन घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.राजकीय सूडापोटी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यादिवशी घटनास्थळी आपण नव्हतोच, उलट तुरुंगातच होतो, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे.
आपण आंदोलकांना हिंसा करण्याची चिथावणी दिलेली नाही. उलट शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन करून पोलिसांना सहकार्यही केले होते, असे शेट्टी यांनी नमूद केले.