Let Me Say It now या राकेश मारिया यांच्या पुस्तकातील मजकुरातून विविध धक्कादायक घटनांचे खुलासे होत आहेत. या पुस्तकातल्याच एका उल्लेखानुसार कॅसेटकिंग गुलशन कुमार यांची हत्या होणार असल्याची माहिती आपल्याला आधीच मिळाली होती असं राकेश मारियांनी म्हटलं आहे.

मारिया काय म्हटले आहेत?
सर, गुलशन कुमार का विकेट गिरनेवाला है अशी माहिती मला माझ्या संपर्कात असलेल्या एका खबऱ्याने दिली होती. गुलशन कुमार हा कॅसेट किंग म्हणून ओळखला जायचा. सुपर कॅसेट इंडस्ट्रीजच्या नावे त्याने स्वतःचं साम्राज्य सुरु केलं होतं. तसंच टी सीरिज ही कॅसेट कंपनीही सुरु केली. अवघ्या काही वर्षात त्याने कोट्यवधी रुपये कमावले. त्याने नव्या गायकांना संधी देण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर देवी-देवतांची गाणी गुलशन कुमारने मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये आणली. त्यामुळे त्या गाण्यांची त्या काळात एक लाटच आली होती. सगळं काही ठिक ठाक चाललं होतं. अशात मला फोन आला. मला माझ्या खबऱ्याने सांगितलं..

राकेश मारियांना फोन आला तेव्हा काय संभाषण झालं?
‘सर, गुलशन कुमार का विकेट गिरनेवाला है’, मी त्याला विचारलं ‘कौन गिरानेवाला है विकेट?’ तर त्याने उत्तर दिलं “अबू सालेम, उसने अपने शूटर्स के साथ सब प्लान नक्की किया है गुलशन कुमार साहाब रोज घरसे निकलके पहले एक शिव मंदिर जाता है. वहींपे काम खतम करने वाले है..” अशी माहिती मला खबऱ्याने दिली. ज्यानंतर मी त्याला विचारलं की ‘खबर पक्की है क्या?’ तर तो म्हणाला “साहब एकदम पक्की खबर है, नहींतो आपको कैसे बताता?” मी त्याला म्हटलं की ‘और कुछ खबर मिले तो बताना’ असं म्हणून मी त्याचा फोन ठेवला आणि विचारात पडलो की आता काय करावं?”

“दुसऱ्या दिवशी सकाळी मी पहिला फोन महेश भट्ट यांना केला. त्यांनाविचारलं की तुम्ही गुलशन कुमारना ओळखता का? ते म्हणाले हो.. मी त्यांचा एक सिनेमाही दिग्दर्शित करतो आहे. सकाळीच माझा फोन आलेला पाहून महेश भट्ट हे काहीसे चकीत झाले. मात्र त्यांनी मला गुलशन कुमार हे रोज शंकराच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात ही माहिती दिली. त्यानंतर मी तातडीने गुन्हे शाखेला कळवलं की गुलशन कुमार यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती व्यवस्था करा. तसेच मला त्यांच्याबाबतची माहिती पुरवत राहा. मात्र १२ ऑगस्ट १९९७ ला मला फोन आला आणि माहिती मिळाली की गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली आहे. मी विचारलं कुठे हत्या झाली? उत्तर आलं की शंकराच्या मंदिराजवळ. मी विचारलं असं कसं काय घडू शकतं? आपण तर त्यांना पोलीस संरक्षण दिलं होतं. यानंतर मी जी चौकशी केली त्यात समजलं की उत्तर प्रदेश पोलीस आणि कमांडो यांनी गुलशन कुमार यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी संरक्षण काढून घेतलं.” असंही राकेश मारियांनी म्हटलं आहे.

“उत्तर प्रदेश पोलीस आणि कमांडो हेदेखील गुलशन कुमार यांचं योग्य रितीने संरक्षण करत होते. काही महिने उलटल्यानंतर गुलशन कुमार यांच्यावरचा जीवाचा धोका टळला असं त्यांना वाटलं. त्यामुळे ते काहीसे बेसावध राहिले आणि हीच संधी साधून गुलशन कुमार यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. गुलशन कुमार यांची हत्या करण्याचा जसा कट आखण्यात आला होता तोच कट प्रत्यक्षात राबवला गेला.”

राकेश मारिया यांच्या पुस्तकात हा मजकूर आहे. राकेश मारियांना गुलशन कुमारच्या हत्येची टीप आधीच मिळाली होती. त्यांनी गुलशन कुमार यांची हत्या होऊ नये म्हणून त्यांच्या परिने प्रयत्नही केले. मात्र तरीही गुलशन कुमार यांची हत्या झाली. तेव्हा नेमकं काय काय घडलं याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.