भिडे, एकबोटे यांच्यावर कारवाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केंद्रातील भाजप सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री असलेल्या रामदास आठवले यांनीही भीमा कोरेगाव हिंसाचाराबद्दल हिंदुत्ववादी संघटनांकडे बोट दाखविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी भेट घेऊन त्यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख आणि समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद एकबोटे यांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर या संपूर्ण प्रकरणाची मूळापासून चौकशी करण्यात येत असून, त्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमत्र्यांनी आश्वासन दिल्याची माहिती आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील आंबेडकरी अनुयायी मोठय़ा संख्येने १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर हल्ले करण्यात आले, गाडय़ांची जाळपोळ करण्यात आली, त्यानंतर राज्यभर त्याच्या हिंसक प्रतिक्रिया उमटल्या. त्याचा निषेध म्हणून आंबेडकरी संघटनांनी राज्यव्यापी बंद पुकारला. त्यावेळीही काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या. राज्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. त्या पाश्वभूमीवर रामदास आठवले यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची कसून चौकशी करुन त्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच बंदच्या काळात निरपराध कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशा मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे, आपण मुख्यमंत्र्यांकडे कोणाच्या नावाचा उल्लेख केला आहे का, असे विचारले असता, आंबेडकरांनी केलल्या मागणीला आपला विरोध नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनाही आपण भिडे व एकबोटे यांची नावे पुढे आली आहेत, त्यांची चौकशी करुन त्यात दोषी आढळले तर, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केल्याची माहिती आठवले यांनी दिली. त्यावर या घटनेच्या मागे कुणाचाही हात असो त्याची गय केली जाणार नाही, चौकशीत दोषी सापडतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्यव्यापी बंदच्या काळात मराठा समाजाने कुठेही हल्ले केले नाहीत, त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली, किंबहुना बंदला सर्वच जाती-धर्माच्या लोकांनी पाठिंबा दिला होता, असे आठवले म्हणाले. राज्यात दलित-मराठा समाजात मैत्रिचे संबंध निर्माण झाले पाहिजेत. दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी) आणि आरक्षणामुळे मराठा समाजात नाराजी आहे. परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, रिपाइंची पहिल्यापासून तशी मागणी आहे. अॅट्रोसिटी कायदा मात्र कोणत्याही परिस्थितीत रद्द केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. संभाजी भिडे यांनी अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे, याकडे लक्ष वेधले असता, त्याचा त्यांनी इन्कार केला. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलल्या मागणीनुसार अॅट्रॉसिटी कायद्याच्या कथित गैरवावपरावर चर्चा करण्याची आपली तयारी आहे, असे त्यांनी सांगितले. सामाजिक सलोखा परिषद भीमा कोरेगाव प्रकरणावरुन राज्यात निर्माण झालेला सामाजिक तणाव कमी करण्यासाठी येत्या १३ जानेवारीला पुणे येथे सामाजिक सलोखा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली. या परिषदेला दलित, मराठा व अन्य समाजातील मान्यवर नेत्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसची यात्रा लांबणीवर मुंबई भीमा कोरेगाव प्रकरणानंतर राज्यातील वातावरण लक्षात घेता काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू करण्यात येणारी राज्यव्यापी यात्रा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र हे सारे प्रकरण हाताळण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या वतीने या महिन्यात कोल्हापूरपासून राज्यव्यापी यात्रा काढण्यात येणार होती. या यात्रेच्या नियोजनाकरिता पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व इतर नेते यावेळी उपस्थित होते. * काँग्रेस पक्षाच्या वतीने पुढील सहा महिने परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. * ही यात्रा राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये काढली जाणार आहे. * पंजाबमध्ये अमरिंदरसिंग व आंध्र प्रदेशात वाय. राजशेखर रेड्डी यांनी त्या त्या राज्यांमध्ये विरोधात असताना काढलेल्या यात्रांचा काँग्रेस पक्षाला फायदा झाला होता.