सुजय विखे-पाटील यांच्या पाठोपाठ रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. गरवारे क्लबमध्ये पक्षप्रवेशाचा हा सोहळा पार पडला. यावेळी मोहिते-पाटील समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांता पाटील, सुभाष देशमुख ही भाजपाची बडी नेतेमंडळी रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पक्ष प्रवेशाच्यावेळी उपस्थित होती. रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपाप्रवेश हा सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला ताकद मिळाली आहे. ‘उद्याची पिढी रोजगार हमी योजनेवर पाठवायची नसेल तर सोलापूर जिल्ह्य़ातील शेतीचे-पाण्याचे प्रश्न सोडवावे लागतील आणि आजच्या घडीला ती ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात असून सत्ता-पदांसाठी नव्हे तर हे प्रश्न सोडवण्यासाठी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जाहीर केले होते. राष्ट्रवादीचे खासदार आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह पाटील यांनीही त्यास पाठिंबा जाहीर केला. माढा लोकसभा मतदारसंघातून पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्याची विद्यमान खासदार व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांची मागणी होती. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने ती अमान्य केल्याने मोहिते-पाटील यांनी पुढील निर्णय घेण्यासाठी मंगळवारी दुपारी अकलूजमध्ये समर्थकांचा मेळावा बोलावला होता. त्यात समर्थकांनी मोहिते-पाटील यांना भाजपप्रवेशाचा निर्णय घेण्याचा आग्रह धरला. त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपप्रवेशाचा निर्णय जाहीर केला. मोहिते- पाटील आणि राष्ट्रवादीत कटुता वाढली होती सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील हे आधी शेकापमध्ये होते. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९६०च्या दशकात मोहिते-पाटील यांना काँग्रेसमध्ये आणले होते. तेव्हापासून मोहिते-पाटील कुटुंबिय आणि काँग्रेसशी एकनिष्ठ होते. विजयसिंह मोहिते-पाटील हे सुरुवातीला माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे निकटवर्तीय मानले जात. राज्याच्या राजकारणातील वसंतदादा गटाचे नेते मानले जाते. वसंतदादा पाटील यांच्या निधनानंतर विजयदादा हे शरद पवार यांच्या जवळ गेले. पुढे विजयदादा हेपवार यांचे निकटवर्तीय झाले. छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यानंतर पवारांनी उपमुख्यमंत्रीपदी विजयदादांना संधी दिली होती. २००४ मध्ये पुन्हा सत्ता मिळाल्यावर विजयदादांना हे पद मिळाले नव्हते. पुढे विजयदादांच्या गटाचे राष्ट्रवादीतूनच पद्धतशीरपणे खच्चीकरण सुरू झाले. मोहिते-पाटील यांच्या कुटुंबियांमध्येही वाद निर्माण झाले. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या खासदारकीची मुदत संपल्यावर त्यांना संधी नाकारण्यात आली. शरद पवार हे राज्यसभेवर गेल्यावर माढा मतदारसंघातून विजयदादांना खासदारकी मिळाली होती. पण राजकीय पुनर्वसन होत नसल्याने रणजितदादा नाराज होते. यातूनच भाजप प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला.