राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचा दावा; मृत्युदरही घटता

मुंबई : महाराष्ट्राने करोनाचा सामना करण्यासाठी अतिशय गांभीर्याने आणि पारदर्शकपणे पावले उचलली आणि त्यामुळेच दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर करोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत करोनावाढीचा वेग किंवा मृत्युदर महाराष्ट्रात कमी आहे असे दिसते, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

२ फेब्रुवारी २०२१च्या आकडेवारीनुसार दर दशलक्ष लोकसंख्येत दिल्लीत ३७ हजार ८४४, गोव्यात ३६ हजार ७३२, पाँडेचरीत ३१ हजार ३५०, केरळमध्ये २८ हजार ८९, चंडीगडमध्ये १९ हजार ८७७ इतके रुग्ण होते. त्यामानाने महाराष्ट्रात यादिवशी १६ हजार आठ रुग्ण होते. महाराष्ट्राचा क्रमांक यामध्ये देशात सहावा होता.

महाराष्ट्राने वेळोवेळी आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले असून कुठेही अगदी सुरुवातीपासून रुग्णसंख्या आणि मृत्यू लपविलेले नाहीत. महाराष्ट्राच्या या प्रामाणिकतेचे आणि करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक आंतरराष्ट्रीय संस्थांनीदेखील  केले आहे. अगदी यासंदर्भातील माहिती अद्ययावत करताना पूर्वीचे जे मृत्यू करोनामुळे झाले होते, पण त्याची नोंद झाली नव्हती अशा सुमारे हजारभर मृत्यूंची नोंद पारदर्शकपणे करण्यात आली. इतर काही राज्यांनी तर करोनाने मृत्यू झालेल्या, पण रक्तदाब, मधुमेह अशा सहव्याधी असलेले मृत्य हे करोना मृत्यू म्हणून नोंद केलेले नव्हते, इतकेच नाही तर केवळ करोना आहे, पण श्वसनाशी संबंधित लक्षणे नाहीत असे करोनाचे मृत्यू गृहीत धरले नाहीत.

एकूण मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात जास्त असली तरी दर दशलक्ष लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. २ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या आकडेवारीनुसार दिल्लीत ६४७, गोवामध्ये ५२७, पुद्दुचेरीत ५२२ आणि महाराष्ट्रात ४०३ मृत्यू झाले. त्यामुळे महाराष्ट्र हे दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर सर्वाधिक मृत्यू असलेले राज्य म्हणता येणार नाही.

सक्रिय रुग्णांबाबत महाराष्ट्रात दर दशलक्ष लोकसंख्येत २९०, रुग्ण असताना केरळमध्ये २००० पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आज आहेत. महाराष्ट्रात विशेषत: मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांत इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या पूर्वीपासूनच किती तरी जास्त आहे. शिवाय लोकसंख्येची घनता आणि शहरीकरण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. असे असूनही दर दशलक्ष लोकसंख्येत दररोज आढळणारे कोविड रुग्ण, बरे होऊन जाणारे रुग्ण आणि त्या तुलनेत कमी होत असलेले मृत्यू यांची सांगड घातली तर महाराष्ट्राने उचललेल्या पावलांमुळे कोविड परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे आरोग्य तपासणीसोबतच संपूर्ण महाराष्ट्रात करोनाबाबत जाणीवजागृती करण्यात आली. दोन टप्प्यांत राबविलेली ही मोहीम करोना रोखण्यात फलदायी ठरली.

मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या धारावीसारख्या भागात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने ज्या उपाययोजना केल्या आणि त्याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे त्या भागातील संसर्ग रोखण्यात यश आले अशा या ‘धारावी पॅटर्न’ची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली. जागतिक आरोग्य संघटनेने या पॅटर्नचे कौतुक करतानाच अन्य राज्यांनीदेखील त्याचा अवलंब करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने केल्या.

अमेरिकी वृत्तपत्रांकडून दखल

महाराष्ट्राने करोना रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्याची दखल ‘वर्ॉंशग्टन पोस्ट’ आणि ‘न्यू यॉर्क टाइम्स’सारख्या जागतिक माध्यमांकडून घेतली गेली. मुंबईत जम्बो कोविड सेंटर्स काही दिवसांत उभारले गेले, तर बीकेसीतील मैदानावर १५ ते २० दिवसांत आयसीयू सुविधा असलेले जम्बो कोविड सेंटर उभारले गेले. हे देशातील पहिले कोविड सेंटर ठरले जे मोकळ्या मैदानावर उभारले गेले.

तुलनात्मक फरक

करोनाच्या वाढत्या दराचा विचार केला तर ३ फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दररोजचा कोविड वाढता दर होता ०.१० टक्के, तर केरळचा दर महाराष्ट्रापेक्षा सहापट जास्त म्हणजे ०.६१ टक्के, गोवा ०.२ टक्के, पंजाब ०.१२ टक्के, गुजरात आणि छत्तीसगड ०.११ टक्के असा दर होता.