रत्नागिरी पोलिसांचा उपक्रम, १० हजार नागरिकांची तापमान, प्राणवायू पातळी तपासणी

मुंबई : करोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी केवळ कठोर निर्बंधांच्या अंमलबजावणी पुरते मर्यादित न राहता पोलिसांनी एक पाऊल पुढे जात संशयित बाधितांना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. रत्नागिरी पोलिसांनी हा अनोखा उपक्रम सुरू केला असून आतापर्यंत दहा हजारांहून अधिक नागरिकांची घरी जाऊन शरीराचे तापमान, प्राणवायू पातळी तपासली.

या तापसणीतून प्राणवायू पातळी कमी असलेले सुमारे ४० संशयित सापडले असून आरोग्य विभागाच्या मदतीने या व्यक्तींची चाचणी करून घेतली.

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागात करोनाची लक्षणे असल्यास चाचणीद्वारे निदान करून घेण्याचा कल नाही. हीच बाब हेरून शासनाने लागू के लेल्या कठोर निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासह स्थानिक यंत्रणांना सोबत घेत दत्तक गाव योजना पोलिसांनी सुरू केली. या योजनेत ३० गावांची जबाबदारी त्या-त्या विभागातील अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली. अधिकाऱ्यांनी वाटून दिलेल्या गावांमधील प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक व्यक्तीचे तापमान, प्राणवायू पातळी मोजावी, हे अपेक्षित आहे.

या तपासणीसोबत लसीकरणासाठी जनजागृती करणे, लसीकरणाबाबत नागरिकांचे गैरसमज दूर करणे, गावकऱ्यांच्या सहकार्य-समानव्यातून विलगीकरण केंद्रे उभारणे आदी उद्देश या उपक्रमामागे आहेत, असेही गर्ग यांनी सांगितले.

तपासणीदरम्यान संशयित आढळलेल्या व्यक्तींची प्रतिजन, आरटीपीसीआर चाचणी के ली जात आहे. बाधित असलेल्यांना तातडीने उपचार मिळण्यासाठी पोलीस आरोग्य विभाग, नगर परिषद, जिल्हा परिषदांसोबत समन्वय राखून आहेत.