भावमधूर संगीताची कास कायम धरत भाषा कुठलीही असो, सहजी लोकांच्या ह्रदयाला भिडेल अशा संगीतातून त्या भावना पोहोचवणे ही संगीतकार रवींद्र जैन यांची खासियत होती. ‘गीत गाता चल, हो साथी गुनगुनाता चल’ हे सहज ओठांवर रूळणारे गाणे असेल किंवा ‘अखियों के झरोकोंसे..’ हे हळूवार संवाद साधणारे गाणेही सहजी गुणगुणता येईल अशा पद्धतीने रचणाऱ्या पद्मश्री संगीतकार रवींद्र जैन यांचे शुक्रवारी लीलावती रुग्णालयात संध्याकाळी चारच्या सुमारास निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असलेल्या जैन यांना दोन दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रविवारी ते नागपूरमध्ये एका गाण्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तेथील वॉकहार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांना नागपूरहून मुंबईतील लीलावती रूग्णालयात आणण्यात आले. अखेर सगळे अवयव निकामी झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
जैन यांच्या पश्चात त्यांची पत्नी दिव्या आणि मुलागा आयुष असा परिवार आहे. जैन यांनी आपल्या कर्तृत्वाने आपले अंधत्व कधीच मागे टाकले होते. अलिगढमधील मोठय़ा परिवारात वाढलेल्या या मुलाने केवळ हिंदीतच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी, बंगाली चित्रपटसृष्टीतही संगीतकार म्हणून आपला ठसा उमटवला.
‘चितचोर’ संगीतकार
त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांमध्ये सचिन आणि रंजीतावर चित्रित झालेले ‘अखियों के झरोकोंसे..’ हे गाणे खूप लोकप्रिय ठरले. विरोधाभास एवढाच की दोन्ही डोळ्यांनी अंध असणाऱ्या या संगीतकाराने आपल्या संगीतामधून कधीच आपली वेदना जाणवू दिली नाही. सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटांमधून रविंद्र जैन यांनी अनेक हळूवार भावगीतांमधून सुरांची पखरण केली. प्रत्येक संगीतकाराचा आपला एक आवडता गायक किंवा गायिका असते. जैन यांच्या संगीताचे नाते जोडले गेले ते गायक येसूदास यांच्याशी.. किंबहूना दक्षिणेकडच्या या गायकाला हिंदी चित्रपटांमध्ये आणणाऱ्या जैन यांचे त्यांच्याशी इतके घट्ट नाते होते की जर आपल्याला दृष्टी मिळालीच तर पहिले येसूदास यांचा चेहरा पहायला आवडेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.
अलिगढ ते मुंबईमार्गे कोलकत्ता
रविंद्र जैन यांचा जन्म अलिगढचा. संस्कृतचे गाढे अभ्यासक आणि आयुर्वेदाचार्य पंडित इंद्रमणी जैन आणि किरण जैन दाम्पत्याच्या आठ मुलांपैकी एक असलेले रविंद्र हे जन्मापासूनच अंध होते. लहानपणापासून जैन भजने, गीते आवडीने गाणाऱ्या रविंद्र यांना संगीताचे शिक्षण देण्याचा निर्णय त्यांच्या आईवडिलांनी घेतला.

रवींद्र जैन यांची गाजलेली गाणी
’आजसे पहेले आजसे जादा
’गोरी तेरा गाव बडा प्यारा ,जब दिप जले आना – (चितचोर)
’राम तेरी गंगा मैली, सुन सायबा सुन – (राम तेरी गंगा मैली)
’ठंडे ठंडे पानीसे नहाना चाहिये- (पती, पत्नी और वो)
’सजना है मुझे सजना के लिए- (सौदागर)
’श्रीरामचंद्र कृपालू भजमन- भक्तीगीत
’दिल मे तुझे बीठाकर- (फकिरा)
’आखियोंके झरोकेसे- चित्रपटाचे शीर्षक गीत
’शाम तेरी बन्सी पुकारे- (गीत गाता चल)