राज्यात करोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असूनही पणन विभागाने विक्रमी २१८.७३ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. गेल्या १० वर्षांत झाली नाही अशी कापसाची विक्रमी खरेदी झाल्याचे पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी एका सादरीकरणाद्धारे सांगितले. या कापूस खरेदीचे एकूण मूल्य ११,७७६.८९ कोटी रुपये असून आतापर्यंत ११,०२९.४७ कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. तसेच सीसीआयने ३० सप्टेंबर २०२० पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषित केले आहे. राज्यात सीसीआय व राज्य कापूस पणन महासंघाने कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावापूर्वी अनुक्रमे ९१.९० व ५४.०३ लाख क्विंटल कापूस खरेदी. अशा प्रकारे एकूण १४५.९३ क्विंटल कापूस खरेदी केली. कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे कापसाचे बाजारातील दर हमीपेक्षा कमी असल्यसामुळे, शेतकऱ्यांचा कल, शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याचा होता. त्यानुसार शासकीय खरेदी नियोजन करून कोव्हिड-१९ च्या काळात सीसीआय व कापूस पणन महासंघाने आजपर्यंत अनुक्रमे ३५.७० व ३६.७५ लाख याप्रमाणे ७२.४५ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. राज्यातील शासकीय व खासगी अशी एकूण खरेदी ४१८.८ लाख क्विंटल झाली असून वास्तविक पाहता ४१० लाख क्विंटल कापूस खरेदी अपेक्षित होती. एकूण ८ लाख ६४ हजार ७२ शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला.