रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि त्यांची पत्नी सामिया गोस्वामी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. यानुसार अर्णब गोस्वामी पत्नीसोबत स्टुडिओमधून आपल्या घरी परतत असताना त्यांच्यावर दोन अज्ञातांनी हल्ला केला. रात्री १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी कारवाई करत दोन्ही हल्लेखोरांना अटक केली आहे.

अर्णब गोस्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “एक दुचाकी सलग त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होती. दुचाकी जवळपास गाडीच्या सोबतच होती. नंतर त्यांनी गाडी थांबवण्याच्या हेतूने दुचाकी गाडीसमोर आणली. यानंतर त्यांच्यातील एकजण गाडीजवळ आला आणि माझ्याकडे बोट दाखवत खिडकीवर हात आदळू लागला. खिडकीची काच फोडण्याचा त्याचा प्रयत्न होता. यावेळी त्याने आपल्याकडील द्रव गाडीवर फेकलं”. दरम्यान हल्ल्यात अर्णब गोस्वामी आणि पत्नी सामिया गोस्वामी यांना सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही.

हल्ला केल्यानंतर अर्णब गोस्वामी यांच्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकांनी या हल्लेखोरांना पकडलं होतं. पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना अटक केली आहे. एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.