आठवडय़ाची मुलाखत : नंदकिशोर दुधे – ‘बीएनएचएस’चे संशोधन साहाय्यक

चिमण्या, पोपट, कावळे, मैना, बुलबुल, कबुतर, सूर्यपक्षी या पक्ष्यांशी मानवी जीवनाच्या अनेक श्रद्धा-अंधश्रद्धा, भाव-भावना जोडल्या गेल्या आहेत. पण शहरीकरणाच्या रेटय़ात हे पक्षी हळूहळू नजरेआड होऊ लागले आहेत. म्हणून मुंबईतील ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’ने ‘कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्राम’ची दोन वर्षांपूर्वी घोषणा केली. आपल्या सभोवतालात आढळणाऱ्या पक्ष्यांची गणना या मोहिमेंतर्गत करण्यात येते. नुकत्याच सुरू झालेल्या मोहिमेच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’ने ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’चे संशोधन साहाय्यक व या कार्यक्रमाचे समन्वयक नंदकिशोर दुधे यांच्याशी संवाद साधला.

* सामान्य पक्षी गणनेचे उद्दिष्ट काय?

जे पक्षी सर्वसामान्यपणे आपल्या परिसरात आढळतात व ज्यांना ओळखायला त्रास होत नाही त्यांना सामान्य पक्षी म्हणता येईल. यात चिमणी, कावळा, पोपट, घार, कोतवाल, मैना, बुलबुल, होला, कोकिळा, शिक्रा, तांबट, जांभळा सूर्यपक्षी यांसारख्या पक्ष्यांचा समावेश होतो. सर्वसामान्य पक्षी गणना करण्याचे काम या कार्यक्रमांतर्गत केले जाते. परिसरात आढळणारे सामान्य पक्षी निरीक्षण करून त्यांची गणना करण्यात येते. हा कार्यक्रम संपूर्ण देशात घोषित करण्यात आला आहे. देशभरातच पक्षी निरीक्षकांची संख्या खूप मोठी आहे. महाराष्ट्रात पुणे येथे पक्षिमित्रांची संख्या मोठी आहे. मात्र आता पक्षिमित्रांनाच पक्षी अभ्यासक बनण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यांनी या पक्ष्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला तर भविष्यात पक्ष्यांची संख्या कळण्यासाठी, कोणत्या पक्ष्यांची संख्या घटली अथवा वाढली हे जाणून घेण्यासाठी उपयोग होईल व या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलता येतील.

* ही गणना कोणत्या पद्धतीने केली जाते?

‘बीएनएचएस’ने २०१५ पासून संपूर्ण देशात या कार्यक्रमाची सुरुवात केली. यासाठी स्थानिक पातळीवरील संस्थांची मदत घेतली जाते. महाराष्ट्रात हा कार्यक्रम राबवला जात असून यासाठी एक वेगळी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर ‘जीआयएस’ सॉफ्टवेअरमार्फत ‘ग्रीड’ टाकण्यात आले आहे. ग्रीड म्हणजे महाराष्ट्राचे २ चौरस किलोमीटरचे काल्पनिक भाग. या ग्रीडवर ‘ट्रान्झिट लाइन’ ही अभ्यासण्याची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. दोन किलोमीटरच्या क्षेत्रात एक रेषा आखण्यात आली असून या रेषेवर वर्षांतून तीन वेळा चालायचे आहे. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या ऋतूंमध्ये यावर चालायचे असते. ज्या ठिकाणापासून आपण सुरुवात करतो तो याचा आरंभबिंदू असेल. या वेळी चालताना केवळ आपल्या डावीकडे व उजवीकडे पाहायचे व दोन्ही बाजूला दिसणाऱ्या पक्ष्यांची नोंद करायची आहे. या वेळी आपल्या मागे पक्षी असले तरी ते मोजायचे नाहीत. वर्षांतून तीन वेळा ही गणना करणे अनिवार्य आहे. पक्ष्यांची आकडेवारी नोंदविण्यासाठी ‘बीएनएचएस’च्या माध्यमातून आम्ही गणना करणाऱ्याला नोंदपत्रिका पुरवतो. त्यात ही नोंद करून ती माहिती ‘बीएनएचएस’कडे सुपूर्द करण्यात येते. ही गणना सुरू करण्यापूर्वी आम्ही पक्षी निरीक्षकाला त्याने पुरविलेल्या अक्षांश आणि रेखांशाच्या आकडय़ावरून तो कोणत्या ग्रीडमध्ये आहे हे कळवतो. गणनेसाठी पक्षी ओळखता येणे अनिवार्य आहे.

* सामान्य पक्षी गणनेचे फायदे काय ?

पक्ष्यांची संख्या जास्त होत आहे किंवा कमी होत आहे, अशा चर्चा आपण नेहमी ऐकतो. पण नेमकी संख्या किती हे कोणाला सांगता येत नाही. उदाहरणार्थ, अनेक जण म्हणतात पूर्वी आमच्याकडे चिमण्या दिसायच्या त्या आता दिसत नाहीत. मग त्यांची योग्य वेळी जर गणना झाली असती तर त्यांची नेमकी संख्या कळून आली असती. तसेच आज मुंबईत एखाद्या ठिकाणी गवताळ भाग आहे जेथे पक्षी खूप आढळतात व तेथील गणना आपण केली आणि काही वर्षांनी उद्योगधंदे त्या गवताळ जागेवर आले आणि ते पक्षी नाहीसे झाले तर याची कारणे आपल्याला कळतील. तसेच ते पक्षी किती संख्येने होते याची माहिती कळेल. पर्यावरण बदलामुळे पक्ष्यांवर परिणाम होतो असे आपण नेहमी म्हणतो. पण या बदलाचा पक्ष्यांवर नेमका काय परिणाम झाला याची शास्त्रीय माहिती या गणनेतून मिळू शकते. यातून आपण पक्षी संवर्धनासाठी काय करावे लागेल याचा अंदाज प्रामुख्याने येईल. उदाहरणार्थ, चिमण्या कमी होत आहेत हे कळल्यावर बर्ड नेस्ट, बर्ड फिडर या संवर्धनात्मक प्रक्रिया सुरु झाल्या.

* पक्षी गणनेला प्रतिसाद मिळतो का?

२०१५ मध्ये हा कार्यक्रम सुरू केल्यानंतर त्यातून आलेल्या निष्कर्षांमध्ये ही बाब आढळली की, जळगाव, अमरावती, नागपूर, वर्धा या भागात लाल बुडाचा बुलबुल हा पक्षी सर्वाधिक आढळून आला. २०१५ व २०१६ मध्ये एकूण २८ ग्रीडमध्ये मिळून १९४ जातींचे १० हजार ८९ पक्षी आढळले. यात लाल बुडाच्या बुलबुलचा आकडा सर्वाधिक म्हणजे ८२१ होता, तर होला पक्षी ६८० होते आणि ५४४ चिमण्या मिळाल्या. याचे कारण म्हणजे आम्हाला उत्तर महाराष्ट्र व विदर्भात चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु कोकणात व मुंबईत आम्हाला प्रतिसाद अद्यापही मिळालेला नाही.

*  मुंबईतून प्रतिसाद का नाही?

पक्षिप्रेमींमध्ये दोन प्रकार आता दिसत आहेत. यात पक्ष्यांचे फोटो काढणाऱ्या पक्षिप्रेमींचे प्रमाण सर्वाधिक दिसून येत आहे. तर पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या कमी आहे. पक्ष्यांचे फोटो काढायचे आणि समाजमाध्यमांवर प्रसारित करायचे ते वेगळे. अशांना पक्ष्यांचा वैज्ञानिकदृष्टय़ा अभ्यास करण्यात रस नसतो. त्यामुळे पक्षी गणनेला प्रतिसाद मिळत नाही. मुंबईत अशा पक्षिप्रेमींकडून प्रतिसाद मिळत नसल्याने निष्कर्षच काढता येत नाही. शहरांत कचऱ्याचे तसेच उघडय़ावर फेकलेल्या अन्नपदार्थाचे प्रमाण जास्त असल्याने कावळे वाढलेले आहेत. तर मुंबईत मोठय़ा संख्येने कबुतरखाने असल्याने येथे कबुतरांची संख्या ही जास्त आहे. परंतु त्यांच्या संख्येबाबत माहिती घेण्यासाठी पक्षी निरीक्षकांनी सहभाग घेणे आवश्यक आहे.

मुलाखत: संकेत सबनीस