अपुऱ्या मनुष्यबळामुळे महानगरपालिके चा निर्णय; बायोमेट्रिक हजेरीही लागणार

मुंबई : शहरातील रुग्णांची वाढती संख्या आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे निवासी डॉक्टरांची पाच दिवस काम आणि दोन दिवस सुट्टी याप्रमाणे नियुक्ती करण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे पालिकेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना दिले आहेत. तसेच, पालिकेच्या आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये लवकरच बायोमेट्रिक हजेरी सुरू होणार असून संसर्ग पसरणार नाही यासाठी सॅनिटायझर किंवा साबणाचा वापर करून हात स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात आल्या  आहेत.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार निवासी डॉक्टरांसह परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे सात दिवस करोना विभाग, सात दिवस सुट्टी आणि नंतरचे सात दिवस करोनाव्यतिरिक्त विभागात असे २१ दिवसांचे चक्राकार पद्धतीने कामाचे नियोजन करण्याची सूचना दिली आहे. यानुसार ६७ टक्के मनुष्यबळ कार्यरत राहून सुमारे ३३ टक्के कर्मचारी विश्रांती करतील, असा हेतू यामागे आहे. मात्र, मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने यापद्धतीने कामाचे नियोजन करण्याचे शक्य नसल्याने निवासी डॉक्टरांना पाच दिवस सलग काम आणि दोन दिवस सुट्टी या पद्धतीने निवासी डॉक्टरांच्या कामांचे नियोजन करण्याचे पालिकेने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. या परिपत्रकानुसार,परिचारिकांनाही दिवस किंवा रात्रपाळीमध्ये सलग पाच दिवस काम आणि दोन दिवस सुट्टी याच पद्धतीने नियुक्ती केली जाईल. या व्यतिरिक्त आठवडय़ाची वेगळी सुट्टी दिली जाणार नाही. वरिष्ठ डॉक्टर वा व्यवस्थापन वा प्रशासकीय कामांमधील डम्ॉक्टरांना ही पद्धती लागू नसेल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विनावैद्यकीय, प्रशासकीय, निमवैद्यकीय सर्व कामाच्या दिवशी १०० टक्के उपस्थित राहील.

मार्डचा परिपत्रकाला विरोध

सतत रुग्णांच्या संपर्कात राहिल्याने विषाणूंचा प्रादुर्भाव(व्हायरल लोड) मोठय़ा प्रमाणात होण्याची शक्यता असते. आत्ता आम्ही ५० टक्के जोखीम पत्करून काम करत आहोत. पाच दिवस काम आणि केवळ दोन दिवस सुट्टी दिल्यास हा धोका  ७० टक्कय़ांपर्यत वाढू शकतो, असे व्यक्त करत नायरमधील निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने मात्र पालिकेच्या या आदेशाला विरोध दर्शविला आहे. रुग्णालयात सद्य परिस्थिती पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून निवासी डॉक्टरांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढल्यास आरोग्य सेवा ठप्प होईल. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी इतर वैद्यकीय महाविद्यालये किंवा रुग्णालयांची मदत घ्यावी. परंतु यासाठी निवासी डॉक्टरांचा जीव धोक्यात घालू नये. पालिकेने हा आदेश मागे घेऊन केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, अशी मागणी ‘मार्ड’ने केली आहे.

विद्यार्थ्यांना सेवा बंधनकारक

तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या निवासी डॉक्टरांनी रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टरांच्या पदावर काम करणे बंधनकारक असेल. ही सेवा पदव्युत्तर बंधपत्रित सेवा म्हणून ग्रा धरली जाईल. तसेच शासकीय किंवा खासगी नर्सिग महाविद्यालयातील दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांच्या विद्यार्थिनींची करोना विभागात नियुक्ती करण्याचे आदेश पालिकेने या पत्रकात दिले असून  अतिरिक्त २० हजार रुपये दर महिन्याला विद्यावेतन पालिकेकडून देण्यात येणार आहे.