महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत घुसमट होत असल्याचा आरोप करत राजीनामा दिलेले मनसेचे कन्नड विधानसभा मतदारसंघातील आमदार हर्षवर्धन जाधव यांना आज अचानक मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव झाल्यामुळे त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच थेट टार्गेट करत आमदार जाधव यांनी बुधवारी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव त्यांना झाली आणि त्यांना आपला राजीनामा मागे घेतला. मात्र मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय कायम असल्याचे त्यांनी आज पुन्हा सांगितले.  दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून त्यांनीच मनसेच्या उपसभापतीकडे दहा लाख रुपयांची लाच मागितल्याचे मनसेचे मराठवाडा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांनी सांगितले. राजीनामा देताना मराठवाडय़ात दुष्कळ असल्याची माहिती नव्हती का, असा सवालही त्यांनी केला. तर आमदारासारखी व्यक्ती दहा लाख एवढी छोटी रक्कम घेत नसल्याची खिल्ली उडवत जाधव यांनी आरोप फेटाळून लावला.