महाराष्ट्रातील ‘सहारा’ प्रकरण

‘सहारा’ प्रमाणेच आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून कोटय़वधींची रक्कम गोळा करणाऱ्या माध्यम क्षेत्रातील निगडीत महेश मोतेवार यांच्या ‘समृद्ध जीवन समूहा’वरील कारवाईचे पाश भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने आवळले आहेत. ‘समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड’ नावाच्या या समूहातील अन्य एका कंपनीला गुंतवणूकदारांची रक्कम तीन महिन्यात परत करण्याचे आदेश देतानाच कंपनीच्या संचालकांना व्यवहार करण्यास प्रतिबंध केला आहे. समूहाशी संबंधित विविध कंपन्यांमध्ये ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम गुंतवणूकदारांकडून गोळा केल्याचा संशय आहे. मोतेवार यांच्यासह चार संचालकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
सेबीचे पूर्णवेळ सदस्य प्रशांत सरन यांनी याबाबतचे आदेश मंगळवारी दिले. कंपनीला सध्याच्या योजना गुंडाळण्यासह यापूर्वी अशा योजनांद्वारे मिळविलेली रक्कमही गुंतवणूकदारांना त्यांच्या परताव्यासह आदेश काढल्यापासून तीन महिन्याच्या आत देण्याचे बंधन घातले आहे. गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यासाठी कंपनीची मालमत्ता विकण्याचा पर्यायही या आदेशाद्वारे कंपनीपुढे आता राहणार नाही. कंपनीच्या सर्व मालमत्तांची तसेच संबंधित बँक खाते, डिमॅट खाते, समभाग, रोखे याबाबतची सर्व माहिती सादर करण्यास सांगितले आहे.
पुणे येथे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या ‘समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड’च्या महेश किसन मोतेवार, वैशाली महेश मोतेवार, घनश्याम जशभाई पटेल व राजेंद्र पांडुरंग भंडारे या चार संचालकांना गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारण्यासह कोणत्याही प्रकारच्या ठेव संकलन योजना राबविण्यास या आदेशाद्वारे मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे भाजपाचे खासदार किरिट सोमय्या यांनी, ‘गुंतवणूकदारांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्यासाठी उपयोगात आणलेली रक्कम ही समूहाने तिच्या विविध वृत्तवाहिन्यांमध्ये वळती केली असल्याचा आरोप केला आहे.