मुंबईसह राज्यातील वीज ग्राहकांना उन्हाळ्यातील तीन महिन्यांचे वीज देयक एकत्र आल्यामुळे निर्माण झालेला जनक्षोभ पाहता या वाढीव वीज देयकांची दहा दिवसांत फेरतपासणी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला.

टाळेबंदीच्या काळातील वाढीव वीज देयकाबाबत उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षां निवासस्थानी बैठक झाली.  वाढीव वीज देयकांची अचूकता तपासावी. तसेच संबंधित वीज ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी करावी आणि हे सर्व झाल्यानंतर प्रत्यक्षात नेमके किती निधीची गरज आहे, याचा लेखाजोखा मांडावा यावर सहमती झाली. त्यानुसार येत्या दहा दिवसांत वाढीव वीज देयकांची फेरतपासणी करण्याचा आदेश वीज वितरण कंपन्यांना देण्यात आला.