प्रवाशांना तक्रार करण्यासाठी मोबाइल अ‍ॅपची सुविधा; वाहनचालकांच्या समस्येचेही निराकरण

मुंबई : रिक्षा, टॅक्सी तसेच खासगी प्रवासी बसचालकांच्या मनमानी कारभाराला आळा बसावा आणि तक्रारींचे त्वरित निराकरण व्हावे यासाठी परिवहन विभागाकडून तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रणालीत ‘मोबाइल अ‍ॅप’ची सुविधा असेल. मनमानी कारभार करणाऱ्या वाहनाचा आणि वाहन क्र मांकाचे छायाचित्र पाठवू शकता. त्याची त्वरित संबंधित आरटीओकडून दखल घेऊन कारवाई के ली जाणार आहे. साधारण दहा दिवसांत ही प्रणाली कार्यान्वित होईल, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली.

राज्यात काळ्या-पिवळ्या रिक्षा व टॅक्सी, मोबाइल अ‍ॅप आधारित टॅक्सी, खासगी प्रवासी बस आदींमधून प्रवास करताना अनेकांना जादा भाडे घेणे, भाडे नाकारणे, प्रवाशांशी विनाकारण हुज्जत घालण्याचे प्रकार वाहनचालकांकडून घडतात. त्यामुळे तक्रारी करण्यासाठी प्रवासी प्रथम वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधतात. मात्र आरटीओकडे तशी सुविधा नाही. एखादी तक्रार करायची असल्यास परिवहनच्या ईमेलवर तक्रार करावी लागते. अशा अनेक तक्रारी मेलवर येतात व त्याचा योग्य पद्धतीने निराकरण होत नाही. त्यामुळे परिवहन विभागाने मोबाइल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७ मध्ये मोबाइल अ‍ॅपची सुविधा होती. दीड वर्ष ही सुविधा मिळाल्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे ती बंद झाली. ती सुधारित करून पुन्हा सेवेत आणण्याचा निर्णय साधारण चार महिन्यांपूर्वी घेण्यात आला. परंतु निधीचा अभाव व तांत्रिक अडचणीमुळे अ‍ॅप सेवा पुन्हा रखडली. परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी शासनाकडून अ‍ॅपला मंजुरी देतानाच निधीसाठीही मंजुरी दिल्याचे सांगितले. त्यामुळे लवकरच ही सुविधा कार्यान्वित होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

नावाची चर्चा

पूर्वी या सुविधेचे नाव ‘आरटीओ महाराष्ट्र’ होते. आता याच नावाने सुविधा आणायची की दुसरे नाव देणे योग्य ठरेल यावर चर्चा सुरू आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत ही प्रणाली सुरू करण्याच्या प्रयत्नात परिवहन विभाग असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मोबाइल अ‍ॅप कसे काम करेल?

  • प्रवासी आणि वाहनचालकांना मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. त्याची माहिती परिवहन विभागाकडून दिली जाईल.
  • त्यात तुमची माहिती नोंद करावी लागेल.
  • अ‍ॅपमध्ये छायाचित्र काढण्याची व ते अपलोड करण्याची सुविधा असेल.
  • यामध्ये तक्रोरींचे पर्याय असतील. ते निवडावे लागतील.
  • ही सर्व माहिती भरून त्यावरूनच पाठविल्यानंतर राज्यातील संबंधित आरटीओला त्याची माहिती कळेल व त्याची दखल घेतली जाईल.
  • दखल घेऊन त्यावर कार्यवाही के ल्याची माहितीही प्रवासी किवा वाहनचालकाला समजेल.

वाहनचालकांच्या समस्येचे निराकरण

प्रवाशांबरोबरच वाहनचालकांनाही येणाऱ्या अडचणींसाठी हे अ‍ॅप काम करेल. प्रवाशांच्या तक्रारी घेतानाच वाहनचालकांना परवाना, लायसन्स (अनुज्ञप्ती) व वाहन सेवेबाबात येणाऱ्या समस्या यावर नोंदविता येणार आहेत.