काँग्रेसने आपल्या राजवटीत देशातील विविध संस्थांना नेहरू-गांधी घराण्यातील व्यक्तींची नावे दिल्यावरून प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांनी टीका केल्याने कपूर आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पेटण्याची लक्षणे दिसत आहेत. या टीकेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कपूर यांच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर निदर्शने करून दगडफेक केली आणि घोषणाबाजी केली. कपूर यांनी असहिष्णुतेच्या प्रश्नावरून सरकारवरही टीका केली होती. देशाच्या कल्याणासाठी ज्यांनी कार्य केले आहे अशा व्यक्तींची नावे प्रमुख स्थळांना, संस्थांना देण्यात यावीत, असे कपूर यांनी म्हटले. काँग्रेसने केलेले नामकरण बदलण्यात यावे, असे त्यांनी म्हटले. वांद्रे-वरळी सी लिंकचे नामकरण लता मंगेशकर अथवा जेआरडी टाटा लिंक असे करावे, काँग्रेस ही स्वत:ची मालमत्ता समजते काय, असा सवाल कपूर यांनी केला आहे.