कोकणी माणसांचा अधिकाधिक रहिवास असलेल्या भांडुपच्या कोकण नगर परिसरात शनिवारी पहाटे साई नगर भांडुप येथील तब्बल ९ घरे चोरटय़ांनी फोडली आहेत. मे महिन्याच्या सुट्टीत रहिवासी गावी गेल्याच्या संधीचा फायदा घेत या घरफोडय़ा झाल्याचे निष्पन्न होत आहे. गेल्याच आठवडय़ात कांजूरमार्गमध्येही अशाप्रकारे घरफोडी झाल्या होत्या. या घरफोडय़ांमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. भांडुप पश्चिम येथील कोकण नगरमधील बागवे कंपाऊंडमधील सर्वोदय चाळीतील विजय गवस, भागिरथी चाळीतील अक्षय कदम, वेणू निवासातील विनय क्षीरसागर, दिपक शेट्ये, समीर सावंत, गौरव पाडावे, दिपक चिरमुले या घरमालकांची घरे एका रात्रीत चोरट्यांनी फोडली आहेत. टेंबीपाडा मार्गावरील जय आनंद सागर सोसायटीतून घरफोडी करून एक लॅपटॉप चोरीला गेल्याची माहिती पोलीसांनी दिली. नऊ घरे फोडली असली तरी या चोऱ्यांमध्ये एकूण ७ ग्रॅम सोने, १० हजार रुपये रोख इतकाच ऐवज चोरटय़ांच्या हाती लागला. भांडुप परिसरातील रहिवासी मे महिन्यात मोठ्या प्रमाणात गावाला जातात. यापकी उशीरा गावाला जाणारे रहिवाशी या चोरयांनी धास्तावले असून कित्येक लोकांनी आपली गावची तिकीटे रद्द करण्याच्या विचारात आहेत. रात्री गस्त घालण्याचाही विचार स्थानिक तरुण करत आहेत. बागवे कंपाऊडमधील राखणदार गेला अन्.. बागवे कंपाऊंडमध्ये गेली १४ वष्रे कधीच चोऱ्या झाल्या नाहीत. कारण कंपाऊंडमध्ये असलेल्या चाळीचा बबन नावाचा कुत्रा राखणदार होता. रात्री अपरात्री तो कधी अपरिचित लोकांना तो कधी फिरकू द्यायचा नाही. काही दिवसांपूर्वी तो अचानक गायब झाला. त्याचवेळी मनात शंकेची पाल चुकचुकली, असे येथील रहिवासी सुंदर करलकर यांनी सांगितले. सहा वर्षांपूर्वी जेव्हा साईनिवासमध्ये राहणाऱ्या समीर सावंत यांच्या लग्नानंतर मोठी चोरी झाली होती तेव्हा बबनला बेशुद्ध करण्यात आले होते. बबनच्या जाण्यानंतर परिसरात गावी गेलेल्या शेजाऱ्यांच्या घरांची राखण करण्यासाठी घरात झोपणारी ही तरूण मंडळी चोऱ्या होऊ नये म्हणून रात्रभर जागतात. गप्पा झाल्यावर उशीरा झोपायला जातात.