मुंबई मनपाने अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईसंबंधी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. कंगनावर अन्याय झाला असून तिच्या कार्यालयावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली. तसंच तिला नुकसान भरपाई दिली जावी असंही ते म्हणाले आहेत.

“पालिकेने २४ तासांची नोटीस देऊन तोडक कारवाई करत नियमाचे उल्लंघन करत कंगनावर अन्याय केला आहे. त्यामुळे कंगनाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, तसंच ज्या अधिकाऱ्यांनी कंगनाच्या कार्यालयावर तोडक कारवाई केली त्यांच्यावर कारवाई केला जावी,” अशी मागणी रामदास आठवले यांनी राज्यपालांकडे केली.

“करोनाला रोखण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आलं आहे. राज्य सरकारने करोनासाठी कठोर पावलं उचलावी असे आदेश राज्य सरकारला द्यावेत,” असंही रामदास आठवले यांनी निवेदनात म्हटलं आहे.