३०० रक्तद्रव पिशव्यांचे संकलन; उपचारांसाठी वापर नाही शैलजा तिवले, लोकसत्ता मुंबई : रक्तद्रव उपचारातील (प्लाझ्मा थेरपी) टायटर चाचणीच्या अटीमुळे राज्यात ‘प्लाटिना’ प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला आहे. या प्रकल्पाअंतर्गत संकलित केलेल्या सुमारे ३०० रक्तद्रवाच्या पिशव्याही चाचणी न केल्याने उपचारासाठी देण्यात अडचणी येत आहेत. प्लाटिना प्रकल्पाअंतर्गत महिनाभरात केवळ २० रक्तद्रवाच्या पिशव्या रुग्णांना देणे शक्य झाले आहे. रुग्णांना या उपचार पद्धतीचा मोठय़ा प्रमाणात फायदा घेता यावा, यासाठी टायटर चाचणीची अट रद्द करावी अशी मागणी प्रयोगशाळांसह वैद्यकीय तज्ज्ञांकडून केली जात आहे. गंभीर प्रकृती असलेल्या सुमारे ५०० रुग्णांना मोफत रक्तद्रव उपचार पद्धतीचा फायदा मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्लाटिना प्रकल्पाची सुरुवात ३० जून रोजी केली. राज्यभरातील १७ वैद्यकीय महाविद्यालयांसह मुंबईतील चार वैद्यकीय महाविद्यालये अशा २१ केंद्रांचा यात समावेश आहे. रक्तद्रव उपचार वैद्यकीय चाचण्यांव्यतिरिक्त सर्वासाठी खुली करताना केंद्रीय आरोग्य विभागाने यामध्ये करोनामुक्त रुग्णांमधून संकलित केलेल्या रक्तद्रवामध्ये १:६४० हून अधिक प्रतिपिंडांचे प्रमाण असावे अशी अट घातली आहे. रक्तद्रवात नेमके किती प्रतिपिंड आहेत, यासाठी टायटर चाचणी केली जाते. यानुसार, संकलित केलेल्या रक्तद्रवाची ही चाचणी करणे बंधनकारक आहे. परंतु ही चाचणी देशभरात केवळ राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये (एनआयव्ही) उपलब्ध आहे. मुंबईतील चार वैद्यकीय महाविद्यालये वगळता प्लाटिना अंतर्गत राज्यभरातील १७ केंद्रामधून सुमारे ३०० रक्तद्रव महिनाभरात संकलित झाला आहे. परंतु याची टायटर चाचणी झाल्याने रक्तद्रव रुग्णांना कसा द्यावा असा प्रश्न रुग्णालयांसमोर आहे. रुग्णांना फटका.. राज्याच्या आरोग्य विभागानेही केंद्रीय आरोग्य विभागाला यासंबंधी प्रस्ताव पाठविलेला आहे. मात्र केंद्रीय आरोग्य विभागाने याची दखल घेतलेली नाही. याचा फटका रुग्णांना बसत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रक्तद्रवामध्ये किती प्रतिपिंड आहेत याचे मोजमाप करणारी चाचणी विकसित करणे शक्य आहे. त्यामुळे केवळ दर्जा तपासून उपयुक्त नाही. ही चाचणी विकसित करून याचे प्रमाणही मोजणे गरजेचे असल्याचे वरिष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. रोहिणी केळकर यांनी सांगितले. ‘अट रद्द करा’ : आत्तापर्यंत रक्तद्रव दिलेल्या रुग्णांमध्ये रक्तद्रव दिल्याने कोणतेही दुष्परिणाम आढळलेले नाहीत. टायटर चाचणी न केलेला रक्तद्रव हा फारतर आवश्यक प्रमाणात उपयुक्त नसेल. परंतु याचा कोणताही धोका नाही. ठोस उपचार उपलब्ध नसताना गंभीर प्रकृतीच्या रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी केवळ टायटर चाचणी न केल्याने रक्तद्रव उपचार देता न येणे हे चुकीचे आहे. ही अट रद्द करण्यासाठी दीड महिन्यापूर्वी इंडियन सोसायटी ऑफ ट्रान्सफ्युजन मेडिसिन यांनी राष्ट्रीय रक्तसंक्रमण विभागाकडे प्रस्ताव पाठविल्याचे रक्तसंक्रमण विभागाच्या तज्ज्ञांनी सांगितले.