सचिन वाझे प्रकरणावरून आधी मुंबई पोलीस आणि नंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले. मुंबई पोलीस दलाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं. विरोधकांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली. थेट राज्यातल्या सरकारलाच धोका निर्माण झाल्याचं चित्र उभं राहिलं. पण त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नवी माहिती दिली आहे. "जेव्हा सचिन वाझेंना पुन्हा पोलीस सेवेत घेतलं होतं, तेव्हाच काही वरीष्ठ नेत्यांशी बोलताना मी म्हणालो होतो की त्यांच्यामुळे पुढे अडचणी निर्माण होतील", असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे आता त्यांचा हा दावा आणि त्यांनी चर्चा केलेले नेते नेमके कोण? अशी नवी चर्चा सुरू झाली आहे. "अधिकारी वाईट नसतो, त्याला." संजय राऊत यांनी काही वरीष्ठ नेत्यांशी बोलल्याचा दावा केला आहे. "जेव्हा सचिन वाझेंना पुन्हा पोलीस खात्यात घेतलं, तेव्हा मी काही वरीष्ठ आणि प्रमुख नेत्यांशी बोलताना म्हटलो होतो की या अधिकाऱ्याचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत पाहाता हा आपल्यापुढे अडचणी निर्माण करू शकेल. आणि मी हे बोललो हे ते नेतेही सांगतील. कोणताही अधिकारी वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवत असते. ज्या पद्धतीने हे प्रकरण घडलं, त्यावर कदाचित कुणाचं नियंत्रण राहिलं नसेल. यातून अनेक मंत्र्यांनाही धडा मिळाला असेल", असं संजय राऊत म्हणाले आहेत. “राज्यातला नेता जेव्हा वारंवार दिल्लीकडे तोंड करून बघतो..”, संजय राऊतांची फडणवीसांवर बोचरी टीका! अनिल देशमुखांची केली पाठराखण! दरम्यान, रोखठोकमध्ये संजय राऊतांनी अनिल देशमुखांवर केलेल्या टिप्पणीनंतर महाविकासआघाडीमध्ये आलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्यावर बोलताना संजय राऊतांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली आहे. "अनिल देशमुख हे सदगृहस्थ आहेत. अनेक वर्ष राजकारणात आहेत. गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर पहिल्यांदाच जबाबदारी पडली आहे. ३ पक्षांचं सरकार चालवताना कदाचित त्यांना काही अडचणी आल्या असतील. या सगळ्या घडामोडींमधून त्यांना खूप गोष्टी शिकता आल्या असतील. नेता असाच घडतो आणि मंत्री असाच घडतो. यातून त्यांना पुढे जाण्यासाठी एक चांगली दिशा मिळणार आहे", असं राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत म्हणतात, “सचिन वाझेंना परत सेवेत घेतलं, तेव्हाच म्हणालो होतो. अडचण होईल!” < येथे वाचा सविस्तर वृत्त #SachinVaze #ShivSena #SanjayRaut #MaharashtraGovernment @rautsanjay61 @ShivSena pic.twitter.com/1ijoidsBZi — LoksattaLive (@LoksattaLive) March 29, 2021 "हा काही मिठाचा खडा नाही" "आपण राजकारणात असू, तर टीका सकारात्मकपणे घेतली पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंवर आयुष्यभर टीका झाली आहे. शरद पवारांवर अजूनही होते. उद्धव ठाकरे टिकेचे घाव सोसूनच या शिखरावर पोहोचले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याबद्दल मी ४ शब्द लिहिले असतील, तर त्याचा अर्थ तुम्ही असा घेऊ नये की आमचं काही भांडण आहे म्हणून. हा काही मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार अजिबात नाही", असं देखील संजय राऊत म्हणाले. शरद पवारांची प्रकृती थोडी नाजूक असल्याचं सुप्रिया ताईंनी सांगितलं – संजय राऊत