राष्ट्रीयकृत बँका, न्यायालयीन कर्मचाऱ्यांचाही समावेश; उपनगरी रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ

मुंबई उपनगरीय लोकलमधून केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रवासाची मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीयकृत बँका, मुंबई पोर्ट ट्रस्ट, न्यायालयीन कर्मचारी, राज भवन कर्मचाऱ्यांचाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून समावेश करताना प्रवासाची परवानगी देण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाडकून देण्यात आली. याची अंमलबजावणी १ जुलैपासून केली जात असून मध्य व पश्चिम रेल्वेने लोकल फेऱ्यांमध्ये वाढही करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांबरोबरच संरक्षण विभाग, आयकर विभाग, जीएसटी, कस्टम, पोस्ट खात्यातील कर्मचारीही लोकलमधून प्रवास करू शकतील,असे स्पष्ट केले आहे.

सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर मार्गावर एकूण २०० लोकल फे ऱ्या होतात. त्यात आणखी १५० फेऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे १ जुलैपासून मध्य रेल्वेवर ३५० फेऱ्या होतील.

पश्चिम रेल्वेवरही २०२ फेऱ्या होत असून यामध्ये बुधवारपासून १४८ फेऱ्या वाढवण्यात आल्याची माहिती दिली. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरही ३५० फेऱ्या होणार आहेत. राज्य सरकारने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच लोकलमधून प्रवास करू शकतील. त्याव्यतिरिक्त सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सध्या मंत्रालय, पोलीस, पालिका कर्मचारी, शासकीय व खासगी रुग्णालय कर्मचारी यांनाच लोकल प्रवासाची मुभा होती. त्यात आणखी काही प्रवाशांची भर पडणार आहे.