संजय निरुपम यांचा आरोप

लोअर परळ येथील कमला मिलमधील ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजोज’ या दोन हॉटेलला लागलेल्या आगीत १४ जण दगावले, या दुर्घटनेला भाजपाचे नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख आणि मुंबई पालिकाच जबाबदार असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. देशमुख यांनी आपले राजकीय वजन वापरून कमला मिलमधील ‘मोजोस’ या पबला परवाने मिळवून दिले होते. तसेच तिथे अनधिकृत बांधकाम हेसुद्धा या आमदाराच्या आशीर्वादाने झालेले होते, असा दावाही त्यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी त्वरित देशमुख यांच्या चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणीही निरुपम यांनी केली आहे.

देशमुख यांनी आरोप फेटाळले

याबाबत आमदार सुधाकर देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, निरुपम यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून पुरावे असल्यास त्यांनी सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान निरुपम यांना दिले.

आपला या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध नसून निरुपम यांना सध्या कोणतेच काम नसल्याने ते नवनवीन आरोप करीत आहेत. या घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असून चौकशीत सत्य समोर येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.